
जामखेड शहराला सध्या भुतवडा धरणातून पाणीपुरवठा होत आहे. सरासरी आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे. सध्या धरणातही चांगला पाणीसाठा आहे. तरीही शहरातील अनेक भागात दहा दिवस झाले तरी पाणी नाही. यामुळे परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उजनी धरणातून कधी पाणी योजना पूर्ण होते व दररोज पाणी मिळते, याची प्रतीक्षा जामखेडवासीयांना लागली आहे. सध्यातरी शहरात पाणीबाणी सुरू आहे.
जामखेड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी तत्कालीन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी नगरविकास खात्याकडे मागणी केली होती. हीच मागणी लक्षात घेत, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहिगाव (उजनी) येथून ६४ किमी लांब असलेली १७९.९८ कोटी रुपयांची महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती. मात्र, नंतर ही योजना अडगळीत पडल्यासारखी झाली होती. यानंतर आमदार रोहित पवार यांनी या योजनेचा पाठपुरावा करून तांत्रिक मान्यता, सुधारित तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता आणि प्रत्यक्ष निधी मिळवणे ही सर्व कामे केली.
करमाळा तालुक्यातील दहिगाव ते जामखेड अशी ६४ किमी अंतर असलेली ही पाणीपुरवठा योजना आहे. दहिगाव येथील उजनी बॅकवॉटरमधून ३५० एच.पी. मोटारने पाणीउपसा करून करमाळा येथे आणण्यात येणार आहे. करमाळा येथून जवळा नान्नज मार्गे ग्रॅव्हिटीने हे पाणी
आठ दिवसांत चारदा पाईपलाईन फुटली
जामखेड शहरासाठी १९७२ला पाणीपुरवठा योजना तयार झाली आणि ती १९७५ ला कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यावेळेस २०११ला लोकसंख्या ३९५५१ एवढी होती, आता २०२५ला लोकसंख्या अंदाजे ५०००० एवढी झाली आहे. लोकसंख्या वाढली; पण पाणीपुरवठा योजना जुनीच आहे. त्यामुळे पाण्याचे रोटेशन बिघडत चालले आहे. तसेच ग्रामपंचायत काळातील पाईपलाईन असल्याने पाईपची मुदत संपली असून, सदर पाईप कंपनीदेखील बंद झाली आहे. सध्या नवीन पाणीपुरवठा योजनांचे काम धिम्यागतीने सुरू आहे. काम करताना सदर ठेकेदाराकडून अनेकदा जुनी पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे आठ दिवसांत चारवेळा पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे पाणी रोटेशन बिघडत आहे. तसेच शेतीची कामे सुरू असून, काम करताना पाईप सतत फुटत असल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यादेखील नाकीनऊ आले आहे. सध्या भुतवडा गावात अनेकदा पाईपलाईन फुटत आहे.
जामखेडजवळील चुंबळी येथे बंद पाईपलाईनद्वारे आणण्यात येणार आहे. यानंतर चुंबळी या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र तयार करून नंतर पुढे पाईपलाईनद्वारे शहरात व उपनगरात अंडरग्राऊंड नवीन पाईपलाईन टाकून नागरिकांना दररोज पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
जामखेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन सतत फुटत असल्याने शहराला दहा ते अकरा दिवसांतून एकदा पाणी मिळत आहे. त्यामुळे लोकांचे पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. याकडे लक्ष देण्यासाठी दोन्ही लोकप्रतिनिधींना वेळ नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.