नदीमशी कधीही मैत्री नव्हती, भालाफेकपटू नीरज चोप्राचा खुलासा

ऑलिम्पिक सुवर्णविजेता आणि पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीम आणि माझ्यात कधीही मैत्रीचे संबंध नव्हते, असा खुलासा हिंदुस्थानचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने केला आहे. तसेच पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध पहिल्यासारखी नक्कीच राहणार नसल्याचेही स्पष्ट केले.

गेल्या महिन्यात पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर चोप्रा आणि त्याच्या पुटुंबीयांना सोशल मीडियावर अपशब्दांच्या लाखोल्या वाहण्यात आल्या होत्या. बंगळुरू येथे होणाऱ्या एनसी क्लासिक स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या नदीमला नीरजने आमंत्रण पाठवल्यामुळे त्याला फार मोठय़ा टीकेला सामोरे जावे लागले होते. यात आपसूक त्याचे कुटुंबीयसुद्धा भरडले गेले, मात्र त्यानंतर ही स्पर्धा स्थगित करण्यात आली.

दोनदा हिंदुस्थानला पदक जिंकून देणाऱ्या नीरजचा डायमंड लीगच्या पूर्वसंध्येला नदीमबरोबर असलेल्या मैत्रीबाबत छेडले असता, नीरज भरभरून बोलला. माझे आणि नदीमशी कधीही जवळचे अथवा जिव्हाळय़ाचे संबंध नव्हते. आमच्यात मैत्रीचेही संबंध नव्हते, मात्र सीमेवर झालेल्या तणावानंतर आमच्यात पहिल्यासारखी चर्चाही होणार नाही. जर कुणी माझ्याही सन्मानाने बोलत असेल तर त्याच्याशीही मी आदरानेच बोलेन. प्रतिस्पर्धी खेळाडू म्हणून आम्हाला एकमेकांशी बोलावेच लागेल. जगभरात माझे अनेक मित्र आहेत. अनेकांशी मैत्रीचे नाते आहे. मात्र भालाफेकीत माझा कुणीही चांगला मित्र नसल्याचे नीरज चोप्राने सांगितले.

या हरयाणवी स्टारने आपले भालाफेकीच क्षेत्र खूप छोटे असल्याचेही सांगितले. यात प्रत्येक जण आपल्या देशासाठी सर्वस्व पणाला लावून खेळतोय. मीसुद्धा माझे सर्वश्रेष्ठ या खेळाला देण्यासाठी प्रयत्न करतोय. परंतु बंगळुरू येथे होणाऱ्या स्पर्धेत मी नदीमला आमंत्रण दिल्यानंतर माझ्याबाबत जे अपमानास्पद प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आणि माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या प्रामाणिकपणाबाबत जे प्रश्न उपस्थित केले त्यामुळे आपण खूप दुःखी झाल्याचेही त्याने न विसरता सांगितले.