134 इमारती कधीही कोसळतील; पालिका रहिवाशांना बजावणार नोटिसा, पश्चिम उपनगरात सर्वाधिक धोकादायक इमारती

प्रातिनिधिक फोटो

मुंबई महापालिने पावसाळ्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात मुंबईतील 134 अतिधोकादायक इमारती आढळल्या असून त्या कधीही कोसळण्याची भीती व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर, या इमारतीतील रहिवाशांना इतर ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या नोटिसा बजावण्यात येणार आहेत. दरम्यान, सर्वाधिक धोकादायक इमारती पश्चिम उपनगरात आहेत.

मुंबईत जुन्या, ब्रिटीशकालीन इमारती असून पावसापूर्वी या इमारतींचे मुंबई महापालिकेकडून सर्वेक्षण केले जाते. मुंबई महापालिकेने केलेल्या यंदाच्या सर्वेक्षणातून 134 अतिधोकादायक इमारती आढळल्या आहेत. यात सर्वाधिक अतिधोकादायक इमारती पश्चिम उपनगरातील वांद्रे, खार, गोरेगाव या भागात आहेत. गेल्या वर्षी ही संख्या 188 होती. गेल्या सहा वर्षांत धोकादायक इमारतींचे पाडकाम करण्यात आल्यामुळे अशा इमारतींची संख्या कमी झाली आहे.

जीवितहानी होऊ नये म्हणून स्थलांतराच्या नोटिसा           

मुसळधार आणि संततधार पावसात अशा अतिधोकादायक इमारती कोसळून दुर्घटना होतात. हे टाळण्यासाठी पालिका या इमारतींचे सर्वेक्षण करून त्यानुसार त्यांच्या श्रेणी तयार केल्या जातात. मात्र, पालिकेने अतिधोकादायक इमारत घोषित करूनही काही इमारतींची रहिवासी इमारती रिकाम्या करण्यास टाळाटाळ करतात. काही जण न्यायालयात जाऊन स्थगिती मिळवतात. त्यामुळे दुर्घटना घडून जीवितहानी होऊ नये, यासाठी पावसाळ्यापूर्वी पालिका अशा इमारतींना नोटिसा बजावते.

अशी केली जाते इमारतींची श्रेणी 

मुंबईतील जुन्या इमारतींचा सर्व्हे केला जातो. त्यात सी-1, सी -2 आणि सी-3 अशी कॅटेगरी केली जाते. सी-1 मध्ये आलेल्या इमारती अतिधोकादायक मानल्या जातात. सी-2 यादीत असलेल्या इमारतींच्या स्ट्रक्चरला रिपेअरची गरज असते, तर सी-3 इमारतींमध्ये किरकोळ दुरुस्ती आवश्यक असते. नियमानुसार धोकादायक इमारतीतून रहिवाशांना नोटिस बजावून सात दिवसांच्या आत इमारत रिकामी करण्याचे प्रशासनाला आदेश दिले जातात.

धोकादायक इमारती  

एच-पश्चिम – (वांद्रे, खार) – 15, पी-दक्षिण – (गोरेगाव पश्चिम) – 15, के-पूर्व (अंधेरी पूर्व) – 11, एन (घाटकोपर) – 11, के-पश्चिम (अंधेरी पश्चिम) – 10, आर-दक्षिण – (कांदिवली पश्चिम) – 8, आर-उत्तर (दहिसर) – 7