
>> आकाश गायकवाड
कल्याण पूर्वेतील तिसगाव रोडवरील ‘श्री सप्तशृंगी’ ही धोकादायक इमारत मंगळवारी दुपारी कोसळली. या दुर्घटनेत सहाजणांचा मृत्यू झाला असून सहा ते सातजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून दोन्ही शहरांमध्ये तब्बल 176 इमारती अतिधोकादायक असल्याचे समोर आले आहे. यमाने दबा धरलेल्या या इमारती पावसाळ्यात केव्हाही कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे या इमारती रिकाम्या करण्याची मोहीम पालिका प्रशासनाने हाती घेतली आहे.
महापालिका हद्दीत एकूण 513 धोकादायक स्थितीतील इमारती आहेत. त्यापैकी तब्बल 176 इमारती ‘अतिधोकादायक’ श्रेणीत आहेत. या इमारतींमध्ये आजही शेकडो नागरिक जीव मुठीत घेऊन राहत असून पावसाळ्यात इमारती कोसळण्याचा धोका वाढल्याने पालिकेने सर्व 10 प्रभाग क्षेत्रांतील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण चालू केले आहे, अशी माहिती बांधकाम विभागाचे उपायुक्त अवधूत तावडे यांनी दिली आहे. घोकादायक इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी तर पोलीस बंदोबस्तात इमारती रिकाम्या करण्याचाही विचार प्रशासनाने सुरू केला आहे.
स्थलांतराचा गंभीर प्रश्न
प्रशासनाने इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी सूचना दिल्या असल्याचे सांगितले आहे. मात्र अनेक रहिवाशांनी आपल्याला नोटिसा मिळाल्या नसल्याचे सांगितले आहे. 176 अतिधोकादायक इमारतींपैकी बहुतांश इमारतींमध्ये अजूनही लोक राहत असल्याचे समोर आले आहे त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रहिवाशांच्या स्थलांतरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
- रहिवाशांनी स्वतःहूनच घरे रिकामी करून प्रशासनाला सहकार्य करावे. विशेषतः 30 वर्षांपेक्षा जुन्या, पडझड झालेल्या किंवा स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक ठरलेल्या इमारतींमधून रहिवाशांनी तातडीने स्थलांतर करावे.
- कल्याण-डोंबिवली परिसरात गेल्या तीन दशकांपासून अनधिकृत आणि निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करून उभ्या करण्यात आलेल्या इमारतींची मोठी संख्या आहे.
- इमारतींच्या ताकदीच्या पलीकडे मजले वाढवून जादा नफा मिळवण्याच्या स्पर्धेमुळे इमारती लवकरच जीर्ण होत आहेत.