
काही प्रकरणांमध्ये जर दोन प्रौढ व्यक्तीमधील संमतीने निर्माण झालेले नाते काही कारणांमुळे तुटले तर त्याला लग्नाआधी खोटे आश्वासन दिल्याचे सांगून त्या व्यक्तीविरोधात बलात्काराचा खटला बनवता येऊ शकत नाही, अशी स्पष्ट टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने नोंदवली. न्यायाधीश बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायाधीश सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने चिंता व्यक्त केली.
चुकीच्या आणि खोट्या आरोपांमुळे ज्याच्या विरोधात आरोप केला आहे त्या व्यक्तीच्या सामाजिक प्रतिमेला धक्का पोहोचतो. तसेच न्यायव्यवस्थेवर सुद्धा भार पडतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले. लग्नाचे वचन मोडणे हे खोटे वचन मानले जाऊ शकत नाही, जोपर्यंत नातेसंबंधाच्या सुरुवातीपासूनच आरोपीचा फसवणूक करण्याचा हेतू नसेल. लग्नाचे वचन मोडण्याला खोटे वचन देऊन कलम 376 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करणे चुकीचे आहे. लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर बलात्कार ठरत नाही, असेही खंडपीठाने म्हटले.
शिक्षित महिलेची फसवणूक कशी?
जर एखादी शिक्षित महिला अनेक महिने लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर फसवणूक किंवा जबरदस्ती केल्याचा आरोप करत असेल तर हे प्रकरण बलात्काराचे नसून ते लिव्ह-इन रिलेशनशीपचे आहे. कारण, शिक्षित महिला इतके महिने फसणुकीत कशी काय राहू शकते, असा सवाल न्यायाधीश विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने केला होता.