
वैध परवाना नाहीच, त्यातही मुदत संपलेल्या डाळी व धान्य किराणा व्यापाऱ्यांना विकणाऱ्या घाटकोपर येथील खुशी ट्रेडिंग व्यापाऱ्याला अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने दणका दिला. असा गैर कारभार करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हरेश खानिया या व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घाटकोपर येथील खोजमाजिनजी इस्टेट येथील एका गाळ्यात खुशी ट्रेडिंगच्या नावाने गैरकारभार सुरू असल्याची माहिती एफडीएला मिळाली. त्यानुसार सहआयुक्त मंगेश माने व सहाय्यक आयुक्त अनुपमा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अभिनंदन रणदिवे व पथकाने 22 तारखेला खुशी ट्रेडिंगच्या गाळ्यावर छापा टाकला होता. तेव्हा तेथे अस्वच्छता व व्यापाऱ्याकडे वैध परवाना नसल्याचे आढळून आले. तसेच त्या ठिकाणी डाळी व अन्य कडधान्य अस्वच्छ जमिनीवर ठेवल्याचे व ते मोठ्या गोण्यांमध्ये भरत असल्याचेही आढळले.
हे धान्य मुदत संपलेले तसेच मुदत संपण्यास काही कालावधी शिल्लक असलेले होते. हे धान्य व्यापाऱ्याने डी मार्टमधून स्वस्तात खरेदी केले होते. गुजरात, भिवंडी, नवी मुंबई येथील डी मार्टमधून असे डाळी वगैरे खरेदी केल्याच्या पावत्यासुद्धा मिळून आल्या. तसेच आरोग्यास धोकादायक असलेले कडधान्य किराणा विक्रेत्यांना विकल्याच्या पावत्याही हाती लागल्या. त्यामुळे याची गंभीर दखल घेत तत्काळ हा कारभार थांबवा. वैध परवाना आणि गाळ्यात स्वच्छता ठेवून व्यवसाय सुरू करा, अशी तंबी खानिया याला दिली होती.
नोटिशीला उडवून लावत पुन्हा सुरू
एफडीएने नोटीस बजावून व्यवसाय बंद करण्यास सांगण्यात आले होते. व्यापाऱ्याने पाच दिवस कारभार बंद ठेवून 29 तारखेला परत आहे तसे सुरू केले. ही माहिती मिळताच अनुपमा पाटील व अभिनंदन रणदिवे यांनी पुन्हा तेथे छापा मारून मनमानी करणाऱ्या बेजाबाबदार खानिया या व्यावसायिकाविरोधात घाटकोपर पोलिसांत तक्रार दिली. त्या तक्रारीवरून पथकाने धान्याचे 13 नमुने घेतले असून एकूण एक हजार 700 किलो धान्य जप्त केले.