
जिल्हा कारागृहाचा दर्जा असलेला अलिबाग शहरातील तुरुंग अक्षरशः कोंडवाडा बनला आहे. या तुरुंगाची क्षमता 82 कैद्यांची असतानाही प्रत्यक्षात 202 कैदी कोंबले असून त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. शौचालय तसेच स्नानगृहांची कमतरता जाणवत आहे. कोंदट वातावरण आणि दाटीवाटीने राहणारे कैदी यामुळे प्रशासनावर कमालीचा ताण पडला आहे. कैद्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यांना सोयीसुविधा पुरवताना तुरुंग यंत्रणेची दमछाक होत आहे. अलिबागमधील हिराकोट किल्ल्याचे रूपांतर जिल्हा कारागृहात करण्यात आले आहे. या कारागृहात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींना ठेवण्यात येते. तेथे 80 पुरुष व 2 महिला असे 82 कैदी ठेवण्याची क्षमता आहे. मात्र जिल्ह्यात वाढत्या गुन्ह्यांमुळे हे कारागृह कमी पडत आहे. रायगडात दररोज 8 ते 10 गुन्हे घडत आहेत. यामुळे न्यायालयीन कोठडी मिळालेल्या आरोपींच्या संख्येतही वाढ होत आहे. सध्या जिल्हा कारागृहात 191 पुरुष व 11 महिला कैदी असे एकूण 202 कैदी ठेवण्यात आले आहेत.
कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याने कैद्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. कोंदट वातावरण, खोल्यांमध्ये दाटीवाटीने राहावे लागत आहे. शौचालय तसेच स्नानगृहांची कमतरताही भेडसावत आहे. याचबरोबर प्रशासनावरही ताण पडत आहे. 82 कैद्यांची क्षमता लक्षात घेऊन तुरुंगात अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पण प्रत्यक्षात त्यांना 202 कैद्यांवर लक्ष ठेवावे लागत आहे.
महिला कैद्यांची गैरसोय
जिल्हा कारागृहात केवळ दोन महिला कैदी ठेवण्याची क्षमता आहे. मात्र सद्यस्थितीत कारागृहात 11 महिला कैदी आहेत. या सर्व महिला कैद्यांसाठी केवळ एक बराक असून तेथे त्यांना दाटीवाटीने राहावे लागत आहे. तसेच महिला कैद्यांसाठी केवळ एक स्नानगृह आहे. यामुळे त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. पुरुष कैद्यांचीही अशीच परिस्थिती आहे. 192 कैद्यांना एक मोठी बराक तसेच 8 छोट्या खोल्यांमध्ये दाटीवाटीने ठेवण्यात आले आहे
नव्याने कारागृह उभारण्याचा प्रस्ताव प्रलंबित
रायगड जिल्ह्यातील गुन्हेगारीत वाढ होत असून कैद्यांसाठी सध्या सुरू असलेले कारागृह अपुरे पडत आहे. यामुळे जिल्ह्यासाठी नवीन कारागृह उभारावे असा प्रस्ताव कारागृह प्रशासनाने राज्य सरकारकडे सादर केला आहे. मात्र मागील सात वर्षांपासून हा प्रस्ताव