
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये मोठा झोल झाल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक ही निवडणुकीच्या चोरीच्या उत्तम उदाहरण असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये लिहिलेल्या लेखातून 5 मुद्दे मांडत निवडणूक चोरीचे षडयंत्र आकडेवारीसह उघड केले आहे.
निवडणूक आयुक्तांची एकतर्फी निवड, मतदार याद्यांमध्ये बोगस मतदार घुसवणे, बनावट मतदान घडवून आणणे, टार्गेट बुथ रिगिंग आणि पुरावे लपवणे अशा मुद्द्यांचा उल्लेख करत राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप केला. तसेच मतदानानंतर अचानक 7.83 टक्के मतदान वाढणे ही इतिहासातील अभूतपूर्व घटना असल्याचेही त्यांनी म्हटले. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लोकशाहीच्या पायमल्लीची ‘ब्लू प्रिंट’ आहे आणि अशी फिक्स झालेली निवडणूक लोकशाहीसाठी विष असल्याचेही ते म्हणाले.
How to steal an election?
Maharashtra assembly elections in 2024 were a blueprint for rigging democracy.
My article shows how this happened, step by step:
Step 1: Rig the panel for appointing the Election Commission
Step 2: Add fake voters to the roll
Step 3: Inflate voter… pic.twitter.com/ntCwtPVXTu— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 7, 2025
निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या पॅनलवर ताबा
राहुल गांधी यांनी पहिल्या मुद्द्यात म्हटले की, 2023 मध्ये झालेल्या कायद्यामुळे पंतप्रधान आणि गृहमंत्री दोनास एक बहुमताने निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करतात. पाशवी बहुमताच्या बळावर संमत झालेल्या या कायद्यामुळे निवड प्रक्रियेमध्ये विरोधी पक्षनेत्याच्या मताला फारसे महत्त्व नाही. स्पर्धेतील स्पर्धकच पंचांची निवड करतात. निवड समितीतून सरन्यायाधीशांना वगळून ते स्थानक कॅबिनेट मंत्र्यांना देण्याचा निर्णय संशयास्पद होता. एखाद्या समितीतील निष्पक्ष व्यक्तीला बाहेर काढन तिथे आपल्या आवडीचा व्यक्ती का बसवला जातो? या प्रश्नातच उत्तर दडलेले आहे.
मतदार यादीमध्ये बनावट मतदारांची भर
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी 8.98 कोटी मतदार होते. पाच वर्षात यात वाढ होऊन लोकसभा निवडणुकीवेळी मतदारांची संख्या 9.29 कोटी झाली. त्यानंतर पाच महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी मतदारांची संख्या 9.70 कोटी झाली. पाच वर्षात 31 लाख मतदार वाढले आणि त्यानंतर पाचच महिन्यात 41 लाख मतदार वाढले. यातील फक्त 15 लाख मतदारांनी मतदान केले, उर्वरित संशयास्पद आहेत, असेही राहुल गांधी यांनी म्हटले.
बनावट मतदानाने मतदानाची टक्केवारी वाढवणे
विधानसभा निवडणुकीवेळी पाच वाजेनंतर कुठेही मतदानासाठी मोठ्या रांगा लागल्याचे दिसत नव्हते. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झाले होते. यात वाढत होत गेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा आकडा 66.05 टक्क्यांवर गेला. याचाच अर्थ 7.83 टक्के वाढ झाली. म्हणजेच जवळपास 78 लाख लोकांनी 5 नंतर मतदान केले. याआधी कोणत्याही विधानसभा निवडणुकीत अशी अचानक वाढ झाली नव्हती. 2009 च्या विधानसभा निवडणुकीवेळी 0.50 टक्के, 2014 ला 1.08 टक्के, 2019 ला 0.64 टक्के वाढ झाली होती. पण 2024 ला यात अनेक पटीने वाढ झाली.
निवडक ठिकाणी बनावट मतदान
महाराष्ट्रात 1 लाख मतदान केंद्र असून वाढीव मतदार फक्त 12 हजार मतदान केंद्रावर घुसवण्यात आले. हे मतदान केंद्र 85 विधानसभा मतदारसंघातील असून येथे लोकसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी खराब होती. कामठी विधानसभेतील घोळ अभ्यासाचा विषय आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला येथे 1.36 लाख, तर भाजपला 1.19 लाख मते मिळाली होती. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जवळपास तेवढीत मते मिळाली, पण भाजपची मते अचानक वाढून 1.75 लाखांवर गेली. दोन निवडणुकांमध्ये मतदार यादीत घुसवण्यात आलेल्या मतदारांमुळे भाजपचे मतदान 56 हजारांनी वाढले. विधानसभा निवडणुकीत भाजपने 149 जागा लढल्या आणि 89 च्या स्ट्राईक रेटने 132 जागा जिंकल्या. पण पाचच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट 32 टक्के होता, याकडेही राहुल गांधी यांनी लक्ष वेधले.
पुरावे लपवण्यात आले
निवडणूक आयोगाने विरोधकांच्या प्रश्नावर मौन धारण केले किंवा आक्रमकपणे उत्तर दिले. 2024 ची लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीची मतदार यादी फोटोसह देण्याची मागणी निवडूक आयोगाने फेटाळली. सीसीटीव्ही फुटेज आणि ईव्हीएम फुटेज देण्यासही नकार दिला. यासाठी सरकारने 1961 निवडणूक नियमामध्ये बदल केला, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.