
मित्रांसोबत पर्यटनासाठी आलेल्या उत्तर प्रदेशातील दोन तरुणांचा लोणावळ्यातील भुशी धरणात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 8) दुपारी दोनच्या सुमारास घडली. ‘शिवदुर्ग मित्र’च्या आपत्कालीन पथकाने शोधमोहीम राबवत अवघ्या दीड तासात दोघांचे मृतदेह बाहेर काढले.
मोहम्मद जमाल (वय 22, रा. विजयपूर, मिर्झापूर, उत्तर प्रदेश), साहिल असरफ अली शेख (वय 19, मूळ – उत्तर प्रदेश, सध्या रा. करसंकलन ऑफीसजवळ, थेरगाव) अशी भुशी धरणाच्या बॅक वॉटर येथे बुडून मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. जमाल आणि साहिल हे दोघे कामानिमित्त थेरगाव येथे आले होते. त्यांच्या काही मित्रांबरोबर सकाळी लोणावळ्यात आले होते. दुपारी ते भुशी धरणाकडे फिरायला गेले आणि ते धरणाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या बॅक वॉटर येथे पोहण्यासाठी उतरले.
या वेळी साहिल आणि जमाल यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते दोघे पाण्यात बुडाले. ते बुडू लागल्याचे लक्षात येताच त्यांच्या मित्रांनी आरडाओरडा केला. आरडाओरडा ऐकून भुशी धरणाच्या पायऱ्या परिसरात सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस कर्मचारी व काही स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र दोघे खोल पाण्यात बुडाले. पोलीस व त्यांच्या मित्रांसह स्थानिकांनी या घटनेची माहिती लोणावळा शहर पोलीस व शिवदुर्ग मित्र आपत्कालीन पथकाला कळवली.
घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सुहास जगताप व काही पोलीस कर्मचारी तसेच शिवदुर्ग मित्रच्या आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या पथकाने पाण्यात उतरून शोधमोहीम हाती घेतली. अवघ्या दीड तासात दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. या मोहिमेत पथकातील महेश म्हसणे, सचिन गायकवाड, कपिल दळवी, योगेश दळवी, दुर्वेश साठे, कुणाल कडू, हर्षल चौधरी, नीरज आवंढे, अशोक उंबरे, पिंटू मानकर, साहेबराव चव्हाण, शाम वाल्मीक, महादेव भवर, राजेंद्र कडू, सागर कुंभार, सागर दळवी व अनिल आंद्रे आदी सहभागी झाले होते. लोणावळा शहर पोलीस तपास करीत आहेत.