
राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांत डिसेंबरपर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरू करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री सूर्य घर योजना राज्यात प्रभावीपणे राबविणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महाऊर्जाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाऊर्जासाठी येत्या काळात दोन उद्दिष्ट्ये महत्त्वाची आहेत. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर ऊर्जेचा वापर करण्याला गती द्यावी लागेल.
प्रधानमंत्री सूर्यघर योजना यशस्वी योजना असून त्या योजनेशी संलग्न असलेली राज्याची योजना सुरू करून पहिल्या टप्प्यात 100 युनिटपर्यंतचे सर्व ग्राहक आणि दुसऱ्या टप्प्यात 300 युनिटपर्यंतचे सर्व ग्राहक सौर ऊर्जेवर आणायचे आहेत. 300 युनिटपर्यंत विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांचे वीज देयक शून्यावर यावे, असा प्रयत्न आहे. ही दोन्ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासंदर्भात महाऊर्जा चांगल्या रीतीने काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री म्हणाले, 2026च्या डिसेंबरपर्यंत कृषीची संपूर्ण विजेची मागणी सौर ऊर्जेवर परिवर्तित करू शकू. गेल्या 20 वर्षांत दरवर्षी विजेचे दर 9 टक्क्याने वाढवत आहोत. 2025 ते 2030मध्ये दरवर्षी विजेचे दर आपण कमी करणार आहोत.