उद्योगविश्व – बॉक्स पॅकिंग काळाची गरज

>> अश्विन बापट

कोकणातल्या शेतकऱयांचं प्रमुख उत्पादन अर्थातच आंबा. अत्यंत स्वादिष्ट फळ, ज्याची विविध बाय-प्रॉडक्ट म्हणजे आंबापोळी, आंबावडी इत्यादी सर्वांच्याच पसंतीची आहेत. दुसरीकडे शेतकऱयांसाठी मात्र या आंब्याची वितरण व्यवस्था, ज्यामध्ये पॅकिंग हा आव्हानात्मक टप्पा असतो. पॅकिंगच्या म्हणजेच कॉरुगेटेड बॉक्सेसच्या उद्योगातल्या  जामसंडेमधल्या गौरव गोगटे यांच्या दमदार वाटचालीबद्दल…

कॉरुगेटेड बॉक्स या पॅकिंगच्या व्यवसायात ‘समर्थ पॅकेजिंग सर्व्हिस’ सुरू करत गेली सुमारे तीन दशकं समर्थ वाटचाल करणाऱया गौरव गोगटेंशी संवाद साधला आणि त्यांचा प्रवास जाणून घेतला.

ते म्हणाले, एलएलबी झालेले माझे वडील अरुण गोगटे यांनी 90च्या दशकात एका मित्राच्या मदतीने या व्यवसायाची सुरुवात केली. त्या काळात कौटुंबिक आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांच्या मूळ पेशाव्यतिरिक्त इतर कामांत पावलं टाकणं गरजेचं होतं. ज्याकरिता वडिलांनी हा व्यवसाय जोमाने सुरू करायचं ठरवलं. सुरुवातीला त्यांनी मुंबईहून हे बॉक्स आणायचे व विकायचं असं ठरवलं. यामध्ये काही काळ गेला. नंतर बॉक्सेसची ने-आण आणि अन्य खर्च लक्षात घेता आमच्या जामसंडेमध्येच प्रॉडक्शन युनिट सुरू करायचं त्यांनी ठरवलं. ते वर्ष होतं 1990. सुरुवातीला आंब्यांसाठी बॉक्स ही कल्पनाच नवी असल्याने ती रुजायला 5 ते 7 वर्षांचा वेळ लागला. पुढे 1996-97 मध्ये ट्रान्सपोर्टरचा संप झाला. त्या वेळेस या
बॉक्सचं महत्त्व लोकांना कळलं. आधी लाकडी पिंजरे, पत्र्याची ट्रंक यांचा वापर आंब्यांची ने-आण करण्याकरिता होत असे. आमच्या कॉरुगेटेड बॉक्सची महती शेतकऱयांना त्या वेळी कळली आणि या व्यवसायाने भरारी घेतली. त्याच सुमारास मासे निर्यातही सुरू झाली. ज्यासाठी बॉक्सची गरज भासू लागली. पुढे मी 2014 मध्ये वडिलांना या व्यवसायात जॉईन झालो. त्या सुमारास वाशी मार्केटमध्ये मोठय़ा प्रमाणात आंबे विक्रीसाठी जात असत. अन्य ठिकाणीही आंबे विक्रीसाठी जाऊ लागले. शेतकरी ग्राहकांना थेट आंबे विक्रीसाठी पाठवू लागले. काळानुरूप कस्टमाईज्ड बॉक्सची निकड भासू लागली. जशी मागणी वाढू लागली तशी व्यवसाय वृद्धी करताना 2016 मध्ये आम्ही जामसंडेमध्ये दुसरं युनिट सुरू केलं. आज आमच्याकडे दोन्ही युनिटमध्ये मिळून अंदाजे दहा पूर्णवेळ पगारी कर्मचारी आहेत, तर सीझननुसार त्यात आणखी 20 ते 30 तात्पुरते कर्मचारी आम्ही अधिकचे काम करायला बोलवत असतो. फेब्रुवारी ते मे तसंच ऑगस्ट ते डिसेंबर या काळात आम्ही खूप व्यस्त असतो. सध्या आमच्याकडे 25 प्रकारचे बॉक्सेस तयार होतात. आंब्याचा विचार केल्यास अर्धा डझन ते सात डझन आंब्यांसाठीचे बॉक्स, तर मासे पॅकिंगसाठी 10, 12, 20 किलोचे बॉक्स तयार केले जातात. दिवसाला प्रत्येक युनिटमध्ये अंदाजे तीन ते पाच हजार बॉक्सची निर्मिती होत असते. आधी आमच्याकडे सात ते आठ मशीन्स होत्या. आता जुन्या युनिटमधील मशीन्सव्यतिरिक्त आम्ही 12 ते 14 मशीन्स नव्या युनिटमध्ये कार्यरत केली. भविष्यात निर्मिती क्षमता वाढवण्यासाठी आणि हे तयार केलेले बॉक्स ठेवण्यासाठी गोडाऊनची जागाही घेण्याच्या दृष्टीने पावलं टाकण्याचा आमचा मानस आहे,’ असं गप्पांची सांगता करताना गौरव यांनी सांगितलं.

(लेखक हे एबीपी माझाचे सीनियर प्रोडय़ुसर

सीनियर न्यूज अँकर आहेत.)