विज्ञान-रंजन – सागरी वाफ आणि पाऊस

>> विनायक

पाऊस पडण्याची प्रतीक्षा आता सर्वच करतायत. शेतीसाठी भरपूर पाऊस पाहिजे आणि शहरी भागातल्या धरणांचा जलसाठा तळ गाठायला लागला की तिथेही आकाशी पाण्याची बरसात व्हायला हवी. निसर्गाने त्याची तयारी केली आहे. अवकाळी किंवा ‘प्री-मॉन्सून’च्या सरी अनेक ठिकाणी हजेरी लावून गेल्या आहेत. यंदा ‘एल निनो’ प्रभावामुळे पाऊस सरासरीपेक्षा कमी होईल असा आधीचा अंदाज होता. पण आता त्याचा प्रभाव ‘न्युट्रल’ (तटस्थ) किंवा नगण्य असल्यामुळे आपल्याकडे पाऊस चांगला होईल आणि नेहमीची सरासरी गाठेल असा अंदाज आहे. हवामानाच्या, भूकंपाच्या, त्सुनामीच्या बाबतीत त्यातल्या त्यात जवळचा निष्कर्ष काढणारा अंदाजच करता येतो. कारण पर्जन्यमापन किंवा भूकंपलेखन यंत्रणा असली तरी विराट निसर्गाच्या लहरीपुढे सारे अंदाज डळमळण्याची शक्यता असते.

पावसाचा सतत चार महिन्यांचा ऋतू असलेला जगातला एकमेव देश म्हणजे हिंदुस्थान. म्हणूनच आपल्याकडे तो एकतृतीयांश वर्ष व्यापणारा संपूर्ण मोसम किंवा ‘मॉन्सून सिझन’ आहे. त्याला कारण आहे ते पृथ्वीच्या दक्षिण भागातला हिंदी महासागर आणि पश्चिमेचा अरबी समुद्र यांच्या पाण्याची उन्हाळय़ात होणारी प्रचंड वाफ हिंदुस्थानी द्वीपकल्पाकडे (तीन बाजूंनी पाण्याचा प्रदेश) वेगाने वाहते व अखेरीस काराकोरम, हिंदूपुश आणि हिमालयाच्या उंचच उंच ‘भिंतींनी’ अडवली जाते. ही वाफ थंडावली की पावसाळा आरंभ होतो. अर्थात त्यापूर्वीच नैऋत्य (दक्षिण-पश्चिम) मोसमी वारे 7 जूनला महाराष्ट्रात पाऊस आणतात. त्याच दिवशी मृग नक्षत्र लागते. त्यामुळे शेतकरी तोपर्यंत नांगरणी करून पेरणीसाठी ‘मृगा’ची वाट पाहतो ही परंपराच आहे.

‘ग्रीष्म संपता मृगापरी (हरिणाप्रमाणे) मृग (नक्षत्र) धावत हा आला (पाऊस), घेऊनि मेघांच्या माला’ अशी एक कविताही आहे. एकोणीसाव्या शतकापर्यंत पिंवा अगदी विसाव्या शतकाच्या पहिल्या सात दशकांपर्यंत या काव्यपंक्तीचा अनुभव येत होता. तो आम्हीही अनुभवलाय. मात्र नंतरच्या पन्नास वर्षांत जगभर वाढत गेलेल्या प्रदूषणाने ‘ग्लोबल वॉर्मिंग’ होऊ लागलं आणि एपूणच पर्यावरणाचा बट्टय़ाबोळ होऊ लागला. जगातल्या सत्ताधीशांनी त्यावर चर्चा करणाऱया परिषदा जरूर घेतल्या, पण ठरलेल्या उपायांची तरी कार्यवाही झाली का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचा परिणाम केवळ माणूसच नव्हे तर पृथ्वीवरच्या (जल आणि भूपृष्ठासह) सर्वच सजीवांना सोसावा लागत आहे.

पृथ्वीवरच्या एकूण जलसाठय़ात ना कधी वाढ होते ना उणीव. त्यात फक्त बदल होतो तो स्वरूपात. द्रवरूप, हिमरूप आणि बाष्परूप अशा तीन प्रकारांत पृथ्वीवरचे पाणी सामावलेले असते. त्यापैकी 98 टक्के खारट पाणी सर्व समुद्रांमध्ये आणि 2 टक्के गोड पाणी नद्या, भूजल, हिमप्रदेश यांमध्ये असते.

नैसर्गिक ‘उर्ध्वपातन’ किंवा ‘डिस्टिलेशन’ पद्धतीने उन्हाळय़ात सागरतळाची वाफ होऊ लागते. ती साठत गेली की त्यातून पर्जन्यमेघ किंवा ‘निम्बस क्लाऊड’ तयार होतात. दरवर्षी सुमारे 45 इंच सागरजलाचे वाफेत रूपांतर झाल्याने वातावरणात एक तरंगता बाष्पसागरच तयार होतो. वातावरणात मिसळणारी 90 टक्के वाफ जलाशयातून तर 10 टक्के वनस्पतींच्या उत्सर्जनातून होते. हे आकडे साधारण आहेत. तंतोतंत नाहीत. सूर्य दरदिवशी 1 ट्रिलियन टन (एकावर 12 शून्य) एवढय़ा पाण्याची वाफ करतो. सूर्यप्रकाशाची प्रखरता ही अशी असते. त्याचप्रमाणे वातावरणातील आर्द्रता (दमटपणा) 12900 घन किलोमीटर किंवा 129वर 14 शून्य एवढी असते.

कमी आर्दता, जास्त तापमान आणि वाऱयाचा वेग यावर वाफेचे स्थलांतर अवलंबून असते. जमिनीवरची तापलेली हवा वरच्या थरात जाताच समुद्रावरचे वारे वेगाने भूभागावर येतात आणि त्यांनी आणलेल्या मेघमालेने आभाळ भरून येते. विषुववृत्ताच्या सुमारे साडेतेवीस अंश उत्तर-दक्षिण पट्टय़ात किंवा उष्ण आणि कमी उष्ण हवामानाच्या भागात सागरी पाण्याचे बाष्पीभवन अधिक होते.

पॅसिफिक महासागर पृथ्वीवरचा सर्वात मोठा जलाशय असल्याने त्यातीत पाण्याची वाफ एपूण वाफेच्या सुमारे 50 टक्के असते, तर अॅटलांटिक समुद्राचे पाणी जास्त खारट असल्याने तेथेही बरेच बाष्पीभवन होते. हिंदी महासागरातील पाण्याचे भाष्पीभवन मोठय़ा प्रमाणात होण्याचे कारण
त्याचा बहुतेक भाग विषुववृत्तीय उष्ण प्रदेशात येतो. याच महासागराकडून आपल्याला मुख्यत्वे ‘पावसाचा पुरवठा’ होतो.

हिंदुस्थानात पाऊस कमी पडत नाही. मात्र तो सर्वत्र सारखाच आणि नियंत्रित पद्धतीने पडायला काही कृत्रिम प्रकल्प नव्हे निसर्ग निर्हेतुकपणे कार्यरत असतो. माणसांच्या गरजा कालपरत्वे बदलतात. त्याची दखल निसर्ग, त्यावर विपरित परिणाम (वाढते तापमान) झाले तर आपोआप घेतो. आपल्याला कायमच निसर्गावर मात वगैरे बाता न मारता निसर्गाला अनुपूल अशी साथ देत स्वतःमध्ये परिवर्तन करण्याची गरज असते. पाऊस या वेळी चांगला पडेल असे भाकीत आहे, पण आपण त्यातले किती पाणी योग्य नियोजनातून साठवू ते आपल्या पृतीत दिसायला पाहिजे अन्यथा उन्हाळय़ाची चाहूल लागताच पाण्यासाठी वणवण होणारे विदारक दृश्य दिसेल. ‘आभाळमाया’ भरपूर जलधन देईल. ते पेलण्यासाठीची आपली ‘झोळी’ फाटकी नसावी इतकेच.