
मुंबई स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी मुंबई महापालिका दिवसरात्र झटत आहे. मुंबईतील कचरा दोन सत्रात उचलला जातो तर दोन वेळा रस्त्यांच्या झाडलोट केली जाते. गृहनिर्माण संस्थांनी कचरा उचलण्यासाठी नेमलेले काही कंत्राटदार मात्र रात्रीच्या अंधारात रस्त्याच्या कडेला कचरा टाकून शहर गलिच्छ करत आहेत. असे प्रकार करणाऱ्या कंत्राटदारांवर लक्ष ठेवले जाणार असून दोषी आढळणाऱ्या कंत्राटदारांवर पालिका कठोर कारवाई करणार आहे, असा इशारा अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिला आहे.
मुंबईतील गृहनिर्माण संकुलांमधून संकलित केलेला कचरा खासगी कंत्राटदार रात्रीच्या वेळी रस्त्यांवर टाकून देत असल्याचे प्रकार उघड झाले आहेत, मात्र अशा प्रकारांकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. अशा कंत्राटदारांवर तत्काळ कठोर कारवाई करावी, असे निर्देश अतिरिक्त पालिका आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात पूर्व उपनगरातील सर्व प्रशासकीय विभागांच्या कामकाजाचा जोशी यांनी घाटकोपरच्या ‘एन’ विभाग कार्यालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला. यावेळी उपायुक्त किरण दिघावकर, उपायुक्त संतोषकुमार धोंडे यांच्यासह पूर्व उपनगरातील सर्व प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
समन्वयाने काम करा!
घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेल्या परिसराची प्रामाणिकपणे स्वच्छता करावी. सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता आणि मुकादम यांनी योग्य संवाद ठेवून जबाबदारी पार पाडावा. सर्व प्रशासकीय विभागांचे सहाय्यक आयुक्तांनी कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावरील उपस्थिती, कामगिरी आदी बाबींची नियमित पाहणी करून आढावा घ्यावा. कचरा संकलित होणारी ठिकाणे यांचा विचार करून कचरा संकलनासाठी सूक्ष्म आराखडा तयार करा.