रस्त्याच्या उजव्या बाजूने चाला! फुटपाथ झाले गायब, पादचाऱ्यांची ‘वाट’ बिकट,जनजागृतीसाठी आरटीओची भरारी पथके जागोजागी सक्रिय

>> मंगेश मोरे

शहर व उपनगरांतील बहुतांश रस्त्यांवरील फूटपाथ गायब झाल्याने पादचाऱ्यांची ‘वाट’ बिकट झाली आहे. अनेक पादचारी रस्त्यावरून चालत असल्याने प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) आता ‘रस्त्याच्या उजव्या बाजूने चाला’ अशी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. जनजागृतीसाठी आरटीओची भरारी पथके जागोजागी सक्रिय झाली आहेत. दरम्यान, फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्यांवर पालिका कठोर कारवाई कधी करणार, असा सवाल पादचाऱ्यांकडून केला जात आहे.

रस्त्यांचे रुंदीकरण, दुकानांचे बेकायदा अतिरिक्त बांधकाम, फेरीवाल्यांचे अतिक्रमण आदी गोष्टींमुळे अनेक ठिकाणी फूटपाथ शिल्लक राहिलेले नाहीत. अशा परिसरात पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. मात्र पादचारी डाव्या बाजूने चालण्याचा नियम पाळत असल्याने मागून भरधाव वेगाने येणाऱ्या गाडय़ांची धडक बसते. त्यात पादचाऱ्यांना जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना गेल्या काही वर्षांत घडल्या आहेत. अशा अपघातांना आळा घालण्यासाठी आरटीओमार्फत पादचाऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. शाळा-कॉलेजसह इतर सार्वजनिक ठिकाणी आरटीओचे कर्मचारी-अधिकारी जाऊन लोकांना रस्त्याच्या उजव्या बाजूने चालण्याचे आवाहन करीत आहेत. यासंदर्भात पत्रके तसेच जागोजागी फलक लावून संदेश दिला जात आहे.

गेल्या काही वर्षांत पादचाऱ्यांच्या अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. पादचाऱयांना मागून येणाऱ्या भरधाव वाहनांचा अंदाज येत नाही. त्यादृष्टीने आम्ही पादचाऱ्यांना फुटपाथ नसलेल्या ठिकाणी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालण्याचे आवाहन करीत आहोत. आरटीओने पादचारी सुरक्षेसाठी हे जनजागृतीचे पाऊल उचलले आहे.

श्याम कासार, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, बोरिवली

चार आरटीओ, सात भरारी पथके

मुंबई शहर व उपनगरांत ताडदेव, वडाळा, अंधेरी आणि बोरिवली कार्यालये कार्यान्वित आहेत. यापैकी ताडदेव, वडाळा व अंधेरी कार्यालयात प्रत्येकी दोन भरारी पथके, तर बोरिवली आरटीओ कार्यालया अंतर्गत एक भरारी पथक पादचाऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी रस्त्यावर उतरले आहे.

मुंबई-ठाण्याहून श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला अनेक भक्तगण पायी चालत जातात. ते भक्तही अनेकदा रस्त्याच्या डाव्या बाजूने चालतात. त्यामुळे अपघाताची भीती असल्याने साईभक्त मंडळांमध्येदेखील जनजागृती करण्यात येत आहे.