शिवसेनेने डोंबिवलीत टॅक्स बिलांची केली होळी, केडीएमसीच्या घनकचरा करवाढीविरोधात उद्रेक

केडीएमसीने घनकचरा करात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. ही वाढ नागरिकांच्या खिशाला परवडणारी नाही. याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने काही दिवसांपूर्वी पालिका मुख्यालयावर मोर्चाही काढला होता. तरीही वाढीव बिलांची आकारणी होत असल्याने आज डोंबिवलीत नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. शिवसैनिकांसह नागरिकांनी महात्मा फुले रोड येथे भरपावसात वाढीव कराच्या बिलांची होळी करत प्रशासनाचा जाहीर निषेध केला.

आठवडाभरापूर्वीच कल्याण महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढून शिवसेनेने या करवाढ विरोधात आवाज उठवला होता. मात्र महापालिकेने करवाढ रद्द न केल्याने आज वाढीव कराच्या बिलांची होळी करण्यात आली. यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी पालिका प्रशासनावर सडकून टीका केली.

गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाने सामान्य जनतेला हजारो रुपयांची भरमसाठ बिले पाठवली आहेत. आठ ते दहा हजार रुपयांपर्यंतच्या करबिलामुळे सामान्य कुटुंबीयांचे आर्थिक गणित कोलमडत आहे. आज आम्ही या बिलांची होळी करत कल्याण-डोंबिवली महापालिकेचा जाहीर निषेध करतो. लवकरच यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही म्हात्रे यांनी दिला.

आंदोलनात जिल्हा संघटक तात्या माने, उपजिल्हाप्रमुख राहुल भगत, शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे, माजी नगरसेवक सुधाकर वायकोळे, महिला विधानसभा संघटक सुप्रिया चव्हाण, महिला शहर संघटक अक्षरा पाटेल, प्रियंका विचारे, उपशहरप्रमुख संजय पाटील, शाम चौगले, विभागप्रमुख प्रमोद कांबळे, उपविभागप्रमुख भावेश पवार, शाखाप्रमुख सचिन जोशी, सूरज पवार, आकाश पाटील, राजेश पाटील, मंगेश सरमळकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भरमसाट दरवाढ
केडीएमसी यापूर्वी घनकचरा शुल्क प्रती घर वार्षिक 600 रुपये घेत होते. आता 900 रुपये केले आहेत. दुकाने, दवाखान्यांसाठी 720 रुपये घेतले जात होते ते आता 1440केले आहेत. ५० खाटांपेक्षा मोठ्या रुग्णालयांसाठी पूर्वी 2160 घेतले जात होते ते आता 4320 करण्यात आले आहेत. शोरूम, फर्निचर, ऑटो मोबाईल, इलेक्ट्रोनिक्ससाठी 1440 रुपये घेतले जात होते. ते आता 2880 केले आहेत. गोदामांसाठी 1440 रुपये घेतले जात होते. ते आता 2880 केले आहेत. उपाहारगृहे व हॉटेलसाठी 14,400 ते 17,280 शुल्क करण्यात आले आहे.