
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात आलेला पूर आता ओसरला आहे. शहरात साफसफाईची कामे सुरू झाली असून व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडली आहेत. पूर ओसरला असला तरी जगबुडी नदी धोका पातळीवर वाहत असल्याने नागरिकांमध्ये पुराचा भीती कायम आहे.
गुरुवारी जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडल्यानंतर खेड शहरात पुराचे पाणी शिरले होते. बाजारपेठेतही पुराचे पाणी शिरल्याने व्यापारी वर्गाचे नुकसान झाले होते. पूर ओसरल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असून रस्ते, दुकाने, घरांची साफसफाई सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या 24 तासात जिल्ह्यात 57.34 मिमी पाऊस पडला. मंडणगड – 144.75 मिमी,खेड – 112.57 मिमी,दापोली – 73.28 मिमी,चिपळूण – 40.89 मिमी,गुहागर – 23.40 मिमी,संगमेश्वर – 54.16 मिमी,रत्नागिरी – 11.66 मिमी, लांजा – 29.80 मिमी , राजापूरमध्ये 25.62 मिमी पावसाची नोंद झाली.