
रशिया-युव्रेन युद्ध थांबवल्याची जाहिरातबाजी करणाऱया, मात्र इराण-इस्रायल संघर्षावर साधी भूमिकाही न मांडणाऱ्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. ‘‘इस्रायलच्या युद्धखोरीवर हिंदुस्थानने बाळगलेले मौन ही केवळ राजनैतिक चूक नाही, तर देशाच्या नैतिक आणि रणनीतिक परंपरेपासून घेतलेली फारकत आहे. देशाची मूल्येच सरेंडर केल्यासारखे आहे,’’ असा घणाघात सोनिया गांधी यांनी केला आहे. ‘‘अजूनही वेळ गेलेली नाही. हिंदुस्थानने जबाबदारीने कृती करून स्पष्ट भूमिका मांडावी आणि शक्य त्या मार्गांचा वापर करून पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करावेत,’’ असे आवाहन त्यांनी सरकारला केले आहे.
इस्रायलच्या लष्करी आक्रमणाच्या विरोधात हिंदुस्थानसह इतर देशांनी भूमिका मांडावी, असे आवाहन हिंदुस्थानातील इराणी दूतावासाचे अधिकारी मोहम्मद हुसेनी यांनी केले होते. त्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी एका इंग्रजी दैनिकात इराण-इस्रायल युद्धावर भाष्य करणारा लेख लिहिला आहे. सोनिया यांनी लेखात काँग्रेसची भूमिका मांडताना देशातील मोदी सरकारच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्हे उपस्थित केले आहेत. देशाचे परंपरागत परराष्ट्र धोरण नेमके काय आहे आणि सध्या आपण कुठल्या दिशेने चाललो आहोत यावर त्यांनी सडेतोड भूमिका मांडली आहे. इस्रायलने इराणवर केलेला हल्ला बेकायदा आणि इराणच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करणारा आहे. हे युद्ध चिघळल्यास मध्य पूर्वेबरोबर जगासाठीही ते घातक ठरू शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
नेतन्याहूंचा इतिहास आगीत तेल ओतण्याचा
‘‘नेतन्याहूंचा इतिहास द्वेष पसरवण्याचा आहे. 1995 सालीही त्यांनी द्वेषाची आग भडकावली होती. त्याची परिणती पंतप्रधान इझाक राबीन यांच्या हत्येत झाली. त्यामुळे इस्रायल व पॅलेस्टीनमधील शांतता प्रक्रिया कायमची थांबली, याची आठवण सोनिया गांधींनी करून दिली आहे.
ट्रम्प जुन्याच चुका करतायत!
वर्षानुवर्षे चालणाऱया युद्धातून माघार घेण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली होती, मात्र आता ते आधीच्याच चुका करत आहेत. 2003मध्ये अशाच पद्धतीने इराकमध्ये संहारक शस्त्रास्त्रs असल्याची हाकाटी पिटून इराकवर युद्ध लादले होते. याकडे सोनिया गांधींनी लक्षवेधले आहे.
स्पष्ट भूमिका मांडावी!
गाझामधील संहाराविरोधात देखील मोदी सरकारने ठोस भूमिका मांडली नाही. तीच चूक इराणच्या बाबतीत केली आहे. देशाच्या परराष्ट्र धोरणाशी सरकारने घेतलेली ही फारकत धक्कादायक आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला आवाजच क्षीण झाला आहे, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. इस्रायलने इराणवर केलेला हल्ला बेकायदा आणि इराणच्या सार्वभौमत्वाचा संकोच करणारा आहे. हे युद्ध चिघळल्यास जगासाठीही ते घातक ठरू शकते.