कुटुंबातील 40 जणांचे जबरदस्तीने मुंडण, मुलीने केला आंतरजातीय विवाह

मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून गावातील लोकांनी मुलीच्या कुटुंबातील 40 सदस्यांचे जबरदस्तीने मुंडण केले. इतकेच नाही तर या कुटुंबाला गावाने वाळीत टाकले. शुद्धीकरणाच्या नावाखाली कुटुंबातील सर्वांचे जबरदस्तीने टक्कल करण्यात आले. तसेच कोंबड्या, बकऱ्यांचा बळी देण्यात आला. ओडिशामधील रायगड जिह्यात ही धक्कादायक घटना घडली. बैगनगुडा गावातील तरुणीने शेजारच्या गावातील अनुसूचित जातीतील तरुणाशी प्रेमविवाह केला.

विवाहानंतर गावकऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर हे कुटुंबांना पुन्हा त्यांच्या जातीत परतायचे असेल तर त्यांना पारंपरिक शुद्धीकरण प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यामध्ये जनावरांचे बलिदान आणि 40 लोकांचे जबरदस्तीने मुंडण करावे लागणार होते. असे न केल्यास संपूर्ण गाव त्यांना वाळीत टाकेल अशी धमकी गावकऱ्यांनी दिली होती. त्यामुळे दबावाखाली येऊन मुलीच्या कुटुंबीयांनी गावकऱ्यांची ही बाब ऐकावी लागली.

हा विवाह गावातील जातिव्यवस्थेच्या तथाकथित नियमांनुसार चुकीचा मानला गेला. त्यामुळे मुलीच्या कुटुंबावर आणि नातेवाईकांवर प्रचंड सामाजिक दबाव टाकण्यात आला.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त होऊ लागला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे. तसेच तपासही सुरू केला.