
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सोमवारी दुपारी टँकरचा भीषण अपघात झाला. टँकर पुलाची रेलिंग तोडून थेट खाडीत कोसळला. यामुळे पाण्यात बुडून टँकर चालकाचा मृत्यू झाला. नायगाव आणि भाईंदरला जोडणाऱ्या वर्सोवा पुलावर ही घटना घडली. चालकाची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, प्रशासकीय पथक आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने चालकाचा मृतदेह बाहेर काढला.
अपघातग्रस्त टँकर गुजरातहून ठाण्याच्या दिशेने चालला होता. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकरने लाकडाने भरलेल्या ट्रेलरला जोरदार धडक दिल्यानंतर चालकाने स्टेअरिंग वळवले. स्टेअरिंग वळवताच टँकरची लोखंडी ग्रीलच्या कठड्याला धडकला आणि कठडा तोडून खाडीत कोसळला. टँकर खाडीत पूर्ण बुडाला. यावेळी चालकाचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
स्थानिकांनी चालकाला वाचवण्यासाठी प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. चालकाकडे ओळखपत्र नसल्याने त्याची ओळख अद्याप पटू शकली नाही. चालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस अपघाताचा सखोल तपास करत आहेत.