
डोंबिवली पूर्व व पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाणपूल सध्या मोठ्या प्रमाणात खड्ड्यांनी वेढला आहे. खड्यांच्या ग्रहणामुळे डोंबिवलीकर त्रस्त झाले असून वाहनचालकांना दररोज तासन्तास वाहतूककोंडीत अडकून पडावे लागत आहे. सकाळी व संध्याकाळी पीक अव्हरला तर शाळेच्या बसेस आणि चाकरमान्यांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
नव्याने पुनर्बाधणी केलेला कोपर उड्डाणपूल सप्टेंबर 2021 मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. निकृष्ट कामामुळे दरवर्षी पुलावर खड्डे पडतात. कायमस्वरूपी खड्डे बुजवले जात नसल्याने वाहनधारक त्रस्त आहेत. कोपर उड्डाणपुलावर विशेषतः पूर्वेकडील वळणावर दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास त्यांना वळण घेणे कठीण होते, परिणामी लगेचच वाहतूक ठप्प होते. तसेच पावसाळ्यात या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढतो. पुलाच्या उतारावर पडलेले खड्डे वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. त्यात भिवंडी, मानकोली व ठाणे परिसरातून येणारी जाणारी अवजड व इतर वाहने डोंबिवलीत शिरताना कोपर उड्डाणपुलाचा उपयोग करतात. हा पूल शहराच्या मध्यभागी असल्याने सर्वच वाहनचालक त्यालाच प्राधान्य देतात. मात्र सतत पडणारे खड्डे, वळणाची अडचण आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.