
राज्यभर नुकतेच वाळू घाटांचे लिलाव झाले. राज्यभर हे घाट राजकीय आणि व्यावसायिकदृष्ट्या दबंग व्यक्तींनी संगनमताने घेतले आहेत. घाटांचे लिलाव झाले. मात्र पावसाळा लागल्याने 10 जून पासून प्रत्यक्ष उत्खनन बंद झाले आहे. मात्र, सेटिंग असल्याने वाळू माफिया सैराट झाले. अशातच जुनोना गावात थेरगाव येथील घाटावरून अवैध उत्खनन केलेले हायवा येणार असल्याची माहिती चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार यांना मिळाली होती.
आपल्या पथकासह त्यांनी हायवा पकडले. आणि हायवा चंद्रपुरात आणत असताना अचानक त्यांच्या शासकीय गाडीपुढे एक कार पार्क करत रस्ता अडविण्यात आला. काही कळायच्या आत माफियांनी हायवा डोळ्यासमोरून पळवून नेले. नंतर कार चालकही फरार झाला. तहसीलदार पवार यांनी या घटनेची तक्रार पोलिसात केली. पोलिसांनी अंकुश वर्मा, सोनूसिंग या वाळू व्यावसायिक आणि कारचालक रहमान खान याच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. शहर पोलीस या धक्कादायक घटनेचा तपास करत आहेत. तहसीलदार पवार यांनी या घटनेनंतरही रात्री आणखी 2 अवैध वाळू वाहने जप्त करत धडक कारवाई चालविली आहे.