नॅशनल पार्कात घुसखोरी वाढली!

पावसाच्या सरी कोसळू लागल्यापासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात निसर्गाला बहर आला असून येथील हिरवाईचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. या गर्दीचा गैरफायदा घेऊन तिकीट न काढता उद्यानात गुपचूप घुसखोरी करण्याचे प्रमाणही वाढले आहे. हे लक्षात येताच उद्यानातील सुरक्षा रक्षकांनी या घुसखोर पर्यटकांना दणका देत त्यांच्याकडून 30 हजार रुपये दंड वसूल केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. ती संधी साधत नॅशनल पार्कातील निसर्गाची मुक्त उधळण अनुभवण्यासाठी शनिवार व रविवारी पर्यटकांनी येथे गर्दी केली होती. पर्यटकांमध्ये लहान मुलांबरोबरच वृद्ध मंडळीही मोठय़ा संख्येने होती. उद्यानाच्या मुख्य तिकीट खिडकीवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न काही पर्यटकांनी केला. तिकीट न काढताच त्यांनी उद्यानात घुसखोरी केली. तेथील सुरक्षा रक्षक व वन अधिकाऱ्यांनी या घुसखोरांना पकडून जवळपास 30 हजार रुपयांच्या दंडाची वसुली केली.

दोन दिवसांत 18 हजार पर्यटकांची भेट, 19 लाखांचा महसूल जमा

शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी तब्बल 18 हजार 211 पर्यटकांनी उद्यानाला भेट दिली. त्यामुळे उद्यानाच्या महसुलात भर पडली. पर्यटकांकडून प्रवेश शुल्काच्या स्वरूपात तब्बल 19 लाख 7 हजार रुपये जमा करण्यात आले.

‘वीकेण्ड असल्याने पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. लोकांमध्ये मोठा उत्साह होता. प्रत्येक पर्यटक फ्रेश होऊन परतताना दिसत होता. गर्दीच्या वेळी काही पर्यटकांनी विनातिकीट घुसण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही तो हाणून पाडला.’  – योगेश महाजन, वनपरिक्षेत्र अधिकारी