
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ही मुंबई महापालिका जिंकणारच परंतु राज्यातील अन्य महानगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषद पंचायत समिती यामध्ये शिवसेनेचे मोठ्या संख्येने प्रतिनिधित्व दिसून येईल, असे प्रतिपादन शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले.
लातूर येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेत शिवसेना उपनेते शरद कोळी जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, संतोष सोमवंशी, महिला आघाडी जिल्हा संघटक जयश्री उटगे, सहसंपर्कप्रमुख नामदेव चाळक यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना चंद्रकांत खैरे यांनी सांगितले पक्षप्रमुखांनी शिवसेनेच्या 13 नेत्यांना राज्यातील सर्व जिल्ह्यांची जबाबदारी निश्चित करून दिलेली आहे. संभाजीनगर सोबतच लातूर आणि सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी माझ्याकडे सोपवण्यात आली असून मदतीसाठी लातूर जिल्ह्यासाठी उपनेते शरद कोळी हे पण निरीक्षक म्हणून आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुका शिवसेनेच्या वतीने लढवण्यासाठी संघटनात्मक बांधणी करण्यासाठी सध्या सर्वजण दौऱ्यावर आहेत. मुंबई महापालिका शिवसेना जिंकणारच त्यासोबतच राज्यातील अन्य ठिकाणीही शिवसेनेचे प्रतिनिधित्व मोठ्या संख्येने दिसून येईल. यापुढील सर्व निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असणार आहेत. या निवडणुका पक्षाने गांभीर्याने घेतल्या असून या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. लातूर जिल्ह्यात निवडणुकी संदर्भात निरीक्षक म्हणून मुंबईचे अन्य काही पदाधिकारी या ठिकाणी येणार असल्याचे त्यांनी सांगितले. लातूर शहर महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे आठ नगरसेवक निवडून आलेले होते त्यावेळी भाजप शून्य होती.
शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द दिलाच नव्हता, भाजपचे मंत्री अतुल सावे यांचे कानावर हात
सध्या भाजप, मिंधेगट अथवा अजित पवार गट केवळ पैशाचा जोरावर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. ते एकत्रित लढतील, असे सध्या तरी दिसून येत नाही. शिवसेनेच्या वतीने स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र, नेत्यांच्या आदेशानुसार आघाडी पण होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. भाजपाच्या वतीने केवळ घोषणांचा पाऊस झाला. परंतु सर्व घोषणा फसव्या आहेत हे आता लोकांना समजून येत आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. बेरोजगारी वाढत आहे. मतासाठी लाडक्या बहिणी आठवल्या पण आता लाडक्या बहिणींचे अनुदान वाढवून दिले नाही. निवडणुकीतील आता घोटाळे उघडकीस येत आहेत. या सरकारमध्ये भ्रष्टाचारा शिवाय कामच होत नाही, अशी टीका त्यांनी केली.
शिवसेनेचे पुढील आंदोलन भ्रष्टाचाराच्या विरोधात होणार आहे, असेही चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा मोठा विरोध होत आहे. पण सरकार ते काम पुढे रेटत आहे. कोणत्याही मंत्र्याकडे अधिकार नाहीत. तसेच मराठवाड्याच्या विकासासाठी दुर्लक्ष होत आहे. या भ्रष्टाचारी लोकांना शिवसेनाच गाडून टाकेल, असेही त्यांनी सांगितले. शिवसेनेचा निर्णय न्यायालयाने पेंडींग ठेवला त्याचा गैरफायदा घेतला जात आहे. या सरकारच्या काळात न्याय मिळत नाही हे दिसून येत आहे, असेही चंद्रकांत खैरे म्हणाले.