
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हेराफेरी करून भाजपला जिंकवल्याचा संशय आहे. त्यामुळेच लोकसभेनंतर विधानसभेला वाढलेली मतदारांच्या संख्येची पडताळणी करण्यासाठी मतदार यादीचा डिजिटल डेटा देण्यात यावा. तसेच मतदानाच्या दिवशीचे व्हिडीओ फुटेज आठ दिवसांत उपलब्ध करून द्या. आम्ही तुमच्याशी चर्चेला येतो, असे पत्र काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठविले आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत वाढलेला मतदानाचा टक्का आणि लोकसभेनंतर अचानक वाढलेली मतदारांची संख्या याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी याच मुद्यावरून आक्रमक भूमिका घेत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त काही प्रश्न उपस्थित केले आहेत. यासंदर्भात निवडणूक आयोगाने 12 जून रोजी राहुल गांधी यांना पत्र पाठवत चर्चेसाठी बोलावले होते. त्या पत्राला काँग्रेसने उत्तर पत्र पाठवले आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र निवडणुकीतील मतदार यादीची डिजिटल प्रत आणि मतदानाच्या दिवसाचे व्हिडीओ फुटेज तातडीने उपलब्ध करून दिल्यास आम्ही चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
वाढीव मतदानाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जाणार -प्रकाश आंबेडकर
निवडणूक आयोगानेच सायंकाळी 6 नंतर 76 लाख वाढीव मतदान झाल्याची माहिती दिली होती. आता तोच निवडणूक आयोग यासंदर्भातील रेकॉर्ड नसल्याचे सांगत आहे. उच्च न्यायालयानेही मूळ याचिका सोडून छोटय़ा मोठय़ा चुकांवर निकाल दिला आहे. या निर्णयाविरोधत आम्ही सर्वोच न्यायालयात जाणार आहोत, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. उच्च न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात बार कौन्सिलकडे जाणार आहोत. तसेच यावर बार कौन्सिलने मत व्यक्त करावे आणि हे प्रकरण पब्लिक डोमेनमध्ये जायला हवे, असा आमचा प्रयत्न असेल. या याचिकेमुळे आम्ही वेळ घालवला असे न्यायालयाचे म्हणणे आहे. हिंमत असती तर त्यांनी दंड लावला असता, असा संताप आंबेडकर यांनी व्यक्त केला.
पत्रात काय म्हटले आहे…
- निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरूनच हे स्पष्ट होते की, मे महिन्यातील लोकसभा निवडणुकीपासून नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत मोठय़ा प्रमाणात नवीन मतदारांची भर पडली. हे नवीन मतदार कोण याची चौकशी झाली पाहिजे.
- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादीची तुलना करण्यासाठी काँग्रेस पक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी मागील सात महिन्यांपासून मतदार यादीची डिजिटल, मशीन-रीडेबल प्रत मागत आहेत ती निवडणूक आयोग का देत नाही.
- देशाला एक सार्वभौम लोकशाही स्वतंत्र प्रजासत्ताक म्हणून स्थापित करण्यास मदत करणारा पक्ष म्हणून आम्ही आमच्या निवडणूक प्रक्रिया मजबूत करण्यासाठी आयोगाला सहकार्य करू.
इथेच संशयाला वाव
निवडणूक आयोगाला विचारलेले प्रश्न आणि मागितलेली माहिती देण्याचे सातत्याने टाळले जात आहे. आम्ही उपस्थित केलेल्या मुद्यांबाबत फुटकळ खुलासे माध्यमांकडे केले जात आहेत. यावरून खरोखरच तुमच्याकडे या मतदार याद्या आहेत की नाहीत? यासंदर्भात तसेच मतदानाच्या दिवसाचे व्हिडीओ फुटेज न देण्याबत शंका आणि संशयाला वाव निर्माण होत असल्याचे कॉँग्रेसने म्हटले आहे.