पत्नीचा खून, दोन मुलांना घेऊन पती पसार

कौटुंबिक वादातून बांधकाम कामगार पतीने पत्नी शिलवंती पिंटू पाटील (वय 30, रा. राजर्षी शाहूनगर, विजयनगर, सांगली) हिचा डोक्यात बांबूने वार करून खून केला. गुरुवारी पहाटे हा प्रकार घडला. खुनानंतर पती पिंटू पाटील हा दोन लहान मुलांना घेऊन पसार झाला आहे. संजयनगर पोलिसांनी पिंटू पाटील याच्या शोधासाठी पथक मंगळवेढा परिसरात रवाना केले आहे.

पिंटू पाटील हा मूळचा मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गावचा रहिवासी आहे. काही वर्षांपासून तो सांगलीत राहतो. सध्या विजयनगरजवळील राजर्षी शाहूनगर येथे रत्नदीप कारंडे यांच्या बंगल्याचे काम चालू होते. तेथे देखरेखीसाठी असलेल्या शेडमध्ये पिंटू पाटील व शिलवंती दोन मुलांसह राहत होते. शिलवंती ही बांधकामाच्या ठिकाणी पाणी मारायचे काम करत होती. तर पिंटू मजुरीवर कामास जात होता. काही दिवसांपासून पिंटू आणि शिलवंती यांच्यात किरकोळ कारणांवरून वाद होत होते. वादास कंटाळून शिलवंती दि. 13 जून रोजी घर सोडून निघून गेली होती. पिंटूने संजयनगर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. शिलवंती पुण्याजवळ बहिणीकडे गेली होती. शनिवारी ती पतीकडे परत आली होती. त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वादावादी सुरू होती. शिलवंती परत आल्याचे संजयनगर पोलिसांना कळविले नव्हते.

आज पहाटे पिंटू याने शिलवंतीच्या डोक्यात बांबूने वार करून तिचा खून केला. त्यानंतर दोन्ही मुलांना घेऊन शेडला बाहेरून कडी लावून तो पसार झाला. पिंटूने पलायन केल्यानंतर सांगोल्यातील ओळखीच्या व्यक्तीला हा प्रकार सांगितला. व्यक्तीने संजयनगर पोलिसांना कळवले. त्यानंतर संजयनगर पोलिसांनी बांधकाम सुरू असलेले ठिकाण शोधले. शेडची कडी काढल्यानंतर आतमध्ये शिलवंती पाटील ही मृतावस्थेत पडल्याचे आढळले. संजयनगरचे पोलीस निरीक्षक सूरज बिजली, पोलीस उपअधीक्षक विमला एम. यांनी घटनास्थळी पाहणी केली.