
रत्नागिरीतील भाटकरवाडा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने तीन दुचाकी जाळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पोलिसांनी या परिसरात सकाळी रूट मार्च केला.
गुरुवारी मध्यरात्री 12.30 ते पहाटे 4.30 च्या दरम्यान भाटकरवाडा येथे अज्ञात व्यक्तींने तीन दुचाकी जाळल्या आहेत . यामध्ये गाडी मालक मिरकर फजल, निहाल मुल्ला आणि इम्तियाज मिरकर यांच्या एक बुलेट, एक ॲक्सेस आणि एक ॲक्टिवा अशा तीन दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. पहाटेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच धावपळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत स्थानिक पोलीस पथकही उपस्थित होते. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे भाटकरवाड्यातील रहिवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
याबाबत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सांगितले की, अज्ञात व्यक्तीने दुचाकी जाळल्या आहेत. सर्व तपास करून आरोपींचा शोध घेतला जाईल. लवकरच आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या परिसरात सकाळी पोलिसांनी रुट मार्च देखील केला. आणि नागरीकांना शांत राहून सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.