हिंदी सक्तीविरुद्ध 5 जुलैला एल्गार, मराठीसाठी उद्धव आणि राज ठाकरे यांचा एकत्र मोर्चा

हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्राविरोधात येत्या 5 जुलैला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र मोर्चा काढणार आहेत.

महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वातील महायुती सरकारने पहिलीपासून हिंदी सक्तीचे धोरण लादण्याचा प्रयत्न चालवला असून त्रिभाषा सूत्राचा हवाला देऊन मराठीची गळचेपी करण्याच्या या भूमिकेविरुद्ध राज्यभरात तीव्र संताप उफाळून आला आहे. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीचा सरकारचा डाव हाणून पाडण्याचा खणखणीत इशारा दिल्यानंतर आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यात आले.

मराठीप्रेमी संघटनांनी 7 जुलै रोजी धरणे आंदोलनाची घोषणा केली होती. त्याच वेळी राज ठाकरे यांनी 6 जुलै रोजी मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. मात्र नंतर मनसेचा मोर्चा 5 जुलै रोजी काढण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या पार्श्वभूमीवर नाटय़मय घडामोडी घडल्या आणि मराठीच्या मुद्दय़ावर उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे एकत्रित या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांना दिली.

राज ठाकरे यांनी गुरुवारी संजय राऊत यांच्याशी पह्नवरून संपर्क साधला. मराठीच्या मुद्दय़ावर दोन वेगळे मोर्चे निघणे योग्य दिसत नाही, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. उद्धव ठाकरे यांनी या भूमिकेचे स्वागत केले. त्यांच्या मान्यतेनंतरच हा मोर्चा एकत्रित काढण्याचा निर्णय झाला.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ाप्रमाणेच हिंदी सक्तीविरुद्ध लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला असून सर्वच राजकीय पक्ष व संघटनांना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. या मोर्चाची वेळ व अन्य तपशील लवकरच निश्चित केला जाईल, असे सांगण्यात आले.

शरद पवार यांचा पाठिंबा

महाराष्ट्र हितासाठी पक्षीय भेदाभेद बाजूला सारून उभे राहणे हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट धोरण आहे. पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या मोर्चात प्रचंड संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जारी केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज कोल्हापुरात होते. त्यांनी सुद्धा परखड मत मांडले. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर नवीन भाषा लादणे योग्य नाही, त्यांना मातृभाषा मराठीतूनच शिक्षण द्यावे आणि पाचवीनंतर हिंदी भाषा येणे विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवश्यक आहे, असे पवार म्हणाले.