Chandrapur news – रक्ताच्या उलट्या, हातापायांना सूज; शिळे अन्न खाल्ल्यानं आश्रमशाळेतील 267 विद्यार्थ्यांना विषबाधा

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत चालवल्या जाणाऱ्या जांभुळघाट येथील आदिवासी शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने मोठी खळबळ उडाली. शाळेतील एकूण ५३८ विद्यार्थ्यांपैकी २६७ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा आरोप आदिवासी संघर्ष समितीने केला आहे. यातील ९ विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. मुलींना रक्ताच्या उलट्या, हातापायांना सूज, चक्कर येणे अशी लक्षणे दिसू लागली. आदिवासी संघर्ष समिती सदस्यांनी शाळेत जाऊन विचारपूस केली असता शिळे अन्न दिल्याची माहिती मिळाली. एकावेळेस अनेक विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्याने त्यांना जांभुळघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले.

सध्या वेदीका चौधरी (वर्ग ४), राजेश नानाजी राजनहिरे (वर्ग ७), ऋतुजा आशीष चौधरी (वर्ग १०), चांदणी इंदरशहा सिडाम (वर्ग ९), स्नेहा नरेंद्र गायकवाड (वर्ग ७), मोनाली अनिल धुर्वे (वर्ग ७), शर्वरी केशव दोडके (वर्ग १०), शिवाणी अंकोष चौधरी (वर्ग ८) आणि अंजली उमेश फरंदे (वर्ग ४) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या विद्यार्थ्यांना नेमका कशाचा त्रास झाला याचा शोध घेतला जात असून त्यांच्या विविध तपासण्या केल्या जात आहेत, अशी माहिती आदिवासी विकास विभागाने दिली.