
परतीच्या पावसाने मराठवाड्याला जबर तडाखा दिला असून पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातही पावसाचे धुमशान सुरू आहे. या पावसाने लाखो हेक्टरवरील पिकांची नासाडी केली असून बळीराजा हादरून गेला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईत आज पावसाचा जोर कमी होता मात्र राज्याच्या अनेक भागात पावसाची कोसळधार सुरूच आहे. मराठवाड्यात आभाळ फाटलं आहे. जालन्यात सोमवारी रात्री 3 तासांत तब्बल 116 मिमी पाऊस झाला. विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, भंडारा, वाशीमला पावसाचा तडाखा बसला असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
मार्केट यार्ड पाण्यात
पुण्यात सकाळी दीड तास धोधो पाऊस झाला. त्यात शहरातील अनेक भागांत पाणी साचले. मार्केट यार्ड जलमय झाले. त्यात विक्रेते आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
आजही मुसळधार
कोकण आणि विदर्भात 22 सप्टेंबरपर्यंत पावसाचा मुक्काम राहणार असून उद्या कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.