
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. फक्त शेतीच उद्ध्वस्त झाली नाही तर शेतीची जमिनही खरडून गेली. यामुळे शेतकरी संकटात सापडला असून या शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत करण्याची राज्य सरकारची तयारी दिसत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यभरात आज काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ते बारामाती येथे माध्यमांशी संवाद साधत होते.
शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि सहकाऱ्यांनी बसून आजचा दिवस दिवाळी साजरी करायची नाही असा निर्णय घेतला. कारण, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. काही ठिकाणी पूर, तर काही ठिकाणी महापूर होता. यात शेती उद्ध्वस्त झाली. नुसती शेती उद्ध्वस्त झाली नाही तर ज्या जमिनीत पिक येते ती जमीनच खरडून गेली. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहे. त्याच्या दृष्टीने शेतीची जमीनच सर्वस्व आहे. त्याचे सर्वस्व गेले असून तो कोणत्या मनस्थितीत दिवाळी साजरी करणार. त्याच्या या दु:खात आमच्या संघटनेने सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
ते पुढे म्हणाले की, संकटे येत असतात. पण अशा वेळाला ज्यांच्याकडे राज्याची, देशाची सत्ता असते, त्यांची संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढण्यास हातभार लावण्याची जबाबदारी असते. राज्य सरकारने काही तोकडी रक्कम जाहीर केली, पण नुकसानीचे स्वरुप बघितल्यानंतर या रकमेचा उपयोग पुन्हा उभे करण्यासाठी होईल असे वाटत नाही. त्यामुळे राज्य सरकारवर संकटग्रस्त शेतकरी नाराज आहे.
माझा या सगळ्या प्रश्नाकडे बघायचा दृष्टीकोन वेगळा आहे. यात राजकारण आणू इच्छित नाही. संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्नांची पराकाष्टा केली पाहिजे आणि ती तयारी राज्य सरकारमधील लोकांनी दाखवली. पण सढळ हाताने मदत करण्याची त्यांची तयारी दिसत नाही. त्यामुळे नाईलाजाने आजचा दिवस साजरा करायचा नाही असा निर्णय आमच्या संघटनेला घ्यावा लागला, असेही पवार म्हणाले.