दिसला भूखंड की ढापायचा, ही महायुतीची नीतीच आहे! आदित्य ठाकरे यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महसूलवाढीसाठी मुंबई महापालिकेने वापरात नसलेले भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी वरळीतील अस्फाल्ट प्लांटच्या भूखंडाचा लिलाव करून भाडेतत्त्वावर दिल्यानंतर आता वरळीतील महापालिकेच्या क्रीडा भवनासाठीची जागाही भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. त्यावरून शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. दिसला भूखंड की ढापायचा, ही महायुतीची नीतीच असल्याचा जबरदस्त टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

आदित्य ठाकरे यांनी आपल्या एक्सवर पोस्ट शेअर करून सरकारच्या या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ”दिसला भूखंड की ढापायचा, ही महायुतीची नीतीच आहे! ह्याचचं उदाहरण आता वरळीत दिसतंय. वरळीकरांसाठी क्रिडाभवन उभारणीसाठीची राखीव जागा आता विकायला काढलीय. निवडणूक होण्याच्या आधीच महापालिका भीकेला आणायची, मुंबईला दिल्लीसमोर झुकवायचं; हेच तर कारनामे या सरकारचे आहेत!

इतर वेळी एकमेकांसोबत भांडतात, कॅबिनेटवर बहिष्कार टाकतात पण भ्रष्टाचार करायच्या वेळी आणि त्याची क्लीन चिट द्यायला सगळ्यांची काय एकी आहे बघा!, असा सणसणीत टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.