पारनेरमधील नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद; आणखी बिबटे असण्याची भीती कायम

पारनेर तालुक्यातील किन्ही येथे 2 डिसेंबर रोजी भागूबाई विश्वनाथ खोडदे यांचा बिबटय़ाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर या बिबटय़ाला पकडण्यासाठी वन विभागाने परिसरात ठिकठिकाणी लावलेल्या 10 पिंजऱ्यांपैकी एका पिंजऱयात नरभक्षक बिबटय़ा रात्री जेरबंद झाला. विशेष म्हणजे, दुपारी पिंजरा लावला आणि रात्री बिबटय़ा त्यात अडकला.

महिलेच्या दुर्दैवी मृत्यूनंतरही वन विभागाच्या वतीने बिबटय़ांना जेरबंद करण्यासाठी अपेक्षित उपाययोजना होत नसल्याने किन्ही बहिरोबावाडी येथील नागरिकांनी 8 डिसेंबर रोजी शेतकरी नेते अनिल देठे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन केले होते. उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करीत बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जातील, असे लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतर परिसरात 10 पिंजरे उपलब्ध करून दिले होते.

हे पिंजरे ठिकठिकाणी लावण्यात येत असतानाच 9 डिसेंबर रोजी कारभारी खोडदे यांच्या शेळीवर बिबटय़ाने झडप घालून उचलून नेली होती. वन विभागाने हाडकीचा तलाव परिसरात पिंजरा लावून त्या पिंजऱयात अर्धवट खाल्लेली शेळी ठेवण्यात आली. सायंकाळी बिबटय़ा अर्धवट खाल्लेल्या शेळीच्या शोधार्थ आला असता, अलगदपणे पिंजऱयात अडकला. अशा प्रकारे ग्रामस्थांच्या सहकार्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पहिला बिबटय़ा जेरबंद करण्यात यश आले आहे. पकडलेल्या बिबटय़ाला रात्री उशिरा सुरक्षितरीत्या पारनेर येथे नेण्यात आले.

बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी जिल्हा उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सहायक उपवनसंरक्षक अविनी दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन धाडे, अजिंक्य भांबुरकर, एस. एन. भालेकर, कानिफनाथ साबळे, वनरक्षक नीलेश बडे, एम. वाय. शेख, एफ. एस. शेख, बी. एस. दवणे, ए. ए. जाधव, एस. के. कापले, ए. बी. पठाण यांच्यासह ग्रामस्थांनी संयुक्तपणे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी केले.

पकडलेला बिबटय़ा नरभक्षक असेल तर ठार करा!

किन्ही येथे बिबटय़ाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असले, तरी या भागात अजूनही बिबटे आहेत. तसेच पकडलेला बिबटय़ा नरभक्षक असेल तर त्यास ठार करावे किंवा अभयारण्यात हलवावे, अशी मागणी शेतकरी नेते अनिल देठे-पाटील यांनी केली आहे.