ठाण्याच्या भाईंदरपाड्यातील सर्वधर्मीय स्मशानभूमी हरवली,महापालिकेचे दुर्लक्ष; राजन विचारे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

भाईंदरपाडा येथील सर्वधर्मीय स्मशानभूमी ‘हरवली’ आहे. दहा वर्षांपासून ही स्मशानभूमी बांधण्यासाठी ठाणे महापालिकेने हालचाली सुरू केल्या, पण अद्याप त्याचे कामही सुरू झालेले नाही. त्यामुळे घोडबंदर भागात राहणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत असून त्यांना अंत्यसंस्कारासाठी दूरवर जावे लागत आहे. महापालिका प्रशासनाने या स्मशानभूमीची एक वीटही अद्याप रचलेली नाही. त्यामुळे स्थानिकांमध्ये मोठा असंतोष असून लवकरात लवकर त्याचे काम सुरू करावे, अन्यथा मोठे आंदोलन उभारू असा इशारा शिवसेनेने दिला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व खासदार राजन विचारे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही पाठवले आहे.

संयुक्त स्मशानभूमी बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय 2016 मध्ये पालिकेने घेतला. त्यास राज्य सरकारनेदेखील परवानगी दिली. पण अद्याप त्याचे बांधकाम झालेले नाही. भाईंदरपाडा येथील 25 हजार चौरस मीटर जागेवर ही सर्वधर्मीय स्मशानभूमी बांधण्यात येणार होती. त्याशिवाय त्या परिसरात बगीचा, पार्किंग अशा सुविधादेखील देण्यात येणार होत्या, पण या सर्व गोष्टी अद्याप कागदावरच आहेत.

2021 मध्ये ‘बालाजी एण्टरप्रायझेस’ने टीडीआरच्या बदल्यात ही स्मशानभूमी बांधण्याची तयारी दर्शवली. तशी परवानगीदेखील ठाणे महापालिकेने दिली.

‘बालाजी एण्टरप्रायझेस’ने स्मशानभूमी विकसित करण्याऐवजी टीडीआर ढापला. स्मशानभूमी बांधलीच नाही. ख्रिश्चन समाजाचे मेलविन फर्नांडिस यांनी मुंबई हायकोर्टात पालिकेच्या विरोधात याचिका दाखल केली.

न्यायालयाने ठाणे महापालिकेला तीन आठवड्याच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करून सत्यस्थिती सांगावी असे आदेश २५ नोव्हेंबर रोजी दिले, पण आजतागायत हे प्रतिज्ञापत्र सादर केले नाही.

विकास कोणासाठी करायचा आहे?

ठाण्याच्या घोडबंदर भागात हिंदू, ख्रिश्चन, ज्यू, मुस्लीम, लिंगायत अशा विविध धर्मीयांचे व समाजाचे लोक राहतात. तिथे मोठमोठे टॉवर्स उभारले जात आहेत. वीज, पाणी, रस्ते, वाहतूक या सुविधांबरोबरच स्मशानभूमी हीदेखील महत्त्वाची गरज आहे. त्याकडेच महापालिका दुर्लक्ष करीत असेल तर नेमका विकास कोणासाठी करायचा आहे, असा संतप्त सवाल शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी केला आहे.