वन्यजीव मंडळाच्या विरोधानंतर सरकार पर्यावरणविरोधी खाण प्रकल्प रद्द करणार का? आदित्य ठाकरे यांचा विधानसभेत सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगप्रसिद्ध ताडोबा अभयारण्यात खाण प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प वन्यजीव आणि पर्यावरण विरोधी असल्याचे स्पष्ट मत राज्य वन्यजीव संरक्षक मंडळाने नोंदवत या प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे. या प्रकल्पाने पर्यावरण आणि व्याघ्र कॉरिडॉरला मोठा धोका निर्माण होणार आहे. तसेच आगामी काळात वाघ आणि मनुष्य यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात याबाबत प्रश्न उपस्थित केला. वनमंत्री गणेश नाईक यांनी यांनी यावर उत्तर दिले.

आदित्य ठाकरे यांनी प्रश्न विचारला की, राज्य वन्यजीव संरक्षक मंडळाच्या सूचना या प्रकल्पाविरोधात होत्या. आता हा विषय राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे सरकार आता हा प्रकल्प रद्द करणार का? आता पर्यावरण विषयक बाबी तपासूनच याला मान्यता देण्यात यावी, अशी सूचना आदित्य ठाकरे यांनी केली. त्यावर वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, या प्रकल्पाला अद्याप सरकारने मान्यता दिलेली नाही. केंद्र सरकारकडे हा रेफर करण्यात येणार आहे. मात्र, या काळात नागपूर खंडपीठाने स्युमोटोद्वारे या विषय त्यांच्या अखत्यारीत घेतला आहे. आता हा विषय न्यायालयाच्या अखत्यारीत गेल्याने सर्वच बाबींचा अभ्यास होणार आहे. तसेच न्यायालयाने प्रकल्पाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यास पुढे काहीच प्रश्न निर्माण होणार नाहीत.

एखादी बाब न्याप्रविष्ठ असल्याने त्यावर मंत्र्यांनी न बोलणे योग्य नाही. धोरण ठरवणे हा आपले काम आहे, असे अध्यक्षआंनी सांगितल्यावर नाईक म्हणाले की, याबाबत पुढील प्रक्रिया सुरू आहे. या मुद्दा केंद्र सरकारडे पाठवण्यासाठी सर्व प्रक्रिया झाली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे नाईक यांनी स्पष्ट केले.