सामना अग्रलेख – मराठी शाळा बंद, राजभाषेचा विजय असो!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील मराठी संस्कृतीच्या संस्था, मैदाने, जिमखाने हातचे गेले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर मुंबईचा भूगोलही बदलला जातो की काय, अशी भीती वाटू लागली आहे. मुंबईचा गळा अमराठी बिल्डरांच्या हातून दाबला जात आहे व हे सर्व बिल्डर भाजपचे आणि मिंध्यांचे अर्थपुरवठादार आहेत. मराठी शाळा बंद पडत आहेत, पण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून दिल्याने ही वेदना व दारिद्र्य विसरायला हवे ही सरकारी इच्छा आहे. मराठी भाषा दिवस उद्या साजरा होत आहे. मराठी भाषा चिरायू होवो, पण त्यासाठी मराठी शाळा टिकवायला हव्यात!

मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर भाजप सरकार व त्यांच्या मित्रमंडळाने आनंदाचा राजकीय उत्सव साजरा केला. शोभायात्रा काढल्या. अभिनंदनाचे ठराव मंजूर केले. गुलाल उधळण्यात आला. ‘आम्ही सत्तेवर होतो म्हणून मराठी भाषेला हा अभिजात दर्जा मिळाला,’ अशा सरकारी जाहिरातबाजीचाही कहर झाला, पण या निर्णयास दीड वर्ष होत आले तरी हा दर्जा फक्त कागदावरच आहे व मराठी भाषा आणि संस्कृतीच्या विकासाचे घोडे इंचभरही पुढे सरकलेले नाही. उलट राज्यातील 255 मराठी शाळा बंद पडल्याची कबुली शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली. ही बाब गंभीर आहे. पालकांचा कल हा मुलांना इंग्रजी शाळेत घालण्याचा असल्याने मराठी शाळा बंद पडत आहेत असे राज्याचे शिक्षणमंत्री सांगत आहेत. मुळात राज्य मंत्रिमंडळातील किती मंत्र्यांची पोरे मराठी माध्यमात शिकत आहेत त्याची माहिती मंत्र्यांनी जाहीर करायला हवी. मराठी भाषेसाठी सरकार इतका आटापिटा करत आहे, पण सत्ताधाऱयांचीच मुले मराठी शाळांची पायरी चढत नाहीत. सरकार चालवणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या घरातही मराठीच्या नावाने बोंबच आहे. याला जबाबदार कोण? ज्या मराठी शाळा बंद पडत आहेत, त्या बहुसंख्य ग्रामीण भागातल्या आहेत. म्हणजे शेतकरी, शेतमजूर, आदिवासींची मुलेही इंटरनॅशनल किंवा कॉन्व्हेंट स्कुलात जातात काय? शिक्षणमंत्री म्हणतात, ‘‘राज्यात दोन हजार मराठी शाळा

अडचणीत आल्या

असून 25 हजार शिक्षक त्यामुळे अतिरिक्त ठरणार आहेत.’’ म्हणजे मराठीचे शिक्षक उद्या बेरोजगार होतील. सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून दिला. निवडणूक प्रचारात त्यावर भाषणे केली, पण निवडणूक संपताच हा अभिजात दर्जा व त्यातून मिळणारे पेंद्रीय सहाय्य फाईलबंद झाले. मराठी भाषा संवर्धनासाठी एक मंत्री नेमले आहेत. त्या मंत्र्यांचे नाव श्रीमान उदय सामंत. ते सांगत आहेत, ‘‘मराठी भाषा संवर्धनासाठी राज्यात, देशात आणि इंग्लंड वगैरे भागात अध्ययन उत्कृष्टता पेंद्रे उभारली जाणार आहेत. तसा प्रस्ताव पेंद्राकडे पाठवला आहे.’’ अहो मंत्रीमहोदय, आधी मुंबई, महाराष्ट्रातील मराठीच्या घसरणीकडे लक्ष द्या. परदेशातला विषय नंतर पाहू. परदेशात कामधंद्यासाठी गेलेले सर्व ‘आंतरदेशीय’ लोक आपापल्या भाषांच्या उद्धारासाठी काम करतील. ते तेथे गेले आहेत ते महाराष्ट्रात व देशात त्यांची ‘सोय’ होत नाही म्हणून. भारत पिंवा महाराष्ट्रावर फार प्रेम उतू चालले, त्यास इंग्लंड आदी देशात जाऊन वाट मोकळी करून देऊ म्हणून ते तेथे गेलेले नाहीत. अनेक देशांत ‘मराठी मंडळे’ सण-उत्सव वगैरे साजरे करतात. त्यांचे मराठी प्रेम तेवढ्यापुरते आहे, पण मराठीवर संकट आहे ते आपल्या महाराष्ट्रात. मराठी राजभाषा आहे, मातृभाषा आहे, पण ती ‘उद्योग’ भाषा नाही. महाराष्ट्रातील अनेक मोठमोठे प्रकल्प व ठेकेदारीची कामे मराठी उद्योजकांना न देता सरळ

गुजराती पंत्राटदारांना

दिली जात आहेत. मुंबई-महाराष्ट्रातील कामे करण्यासाठी ‘मराठी टॅलेंट’ उपलब्ध असताना गुजरातसारख्या राज्यातून येणाऱ्या कंत्राटदारांसाठी पायघड्या घालायच्या हीच मराठी पीछेहाटीची कारणे आहेत. मराठी भाषा पीछेहाटीचा विषय आर्थिक आणि उद्योग क्षेत्राशी, व्यापाराशी, रोजगार व्यवस्थेशी निगडित आहे. मराठीची संमेलने भरवून, त्यात भाषणे ठोकून व अशा संमेलनांत मंत्र्यांनी फुकटचे मिरवून हा प्रश्न सुटणार नाही. मराठीत प्राथमिक शिक्षण आधी सर्वच स्तरांवरील शिक्षण संस्थांतून सक्तीचे केले पाहिजे, तर त्या तुमच्या अभिजात दर्जाचा उपयोग. मुंबईतील मराठी ग्रंथसंग्रहालये, साहित्य संघासारख्या वास्तूंवर अमराठी बिल्डरांचा वाकडा डोळा आहे. मुंबईतील मराठी संस्कृतीच्या संस्था, मैदाने, जिमखाने हातचे गेले आहेत. गिरगावचे रूपडेच पालटले. मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर मुंबईचा भूगोलही बदलला जातो की काय, अशी भीती वाटू लागली आहे. मुंबईचा गळा अमराठी बिल्डरांच्या हातून दाबला जात आहे व हे सर्व बिल्डर भाजपचे आणि मिंध्यांचे अर्थपुरवठादार आहेत. त्यामुळे ‘पैसा’, लुटमार हीच त्यांची भाषा व संस्कृती आहे. मराठी शाळा बंद पडत आहेत. मराठी माणूस आपल्याच राज्यात उपेक्षिताचे जिणे जगत आहे, पण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून दिल्याने ही वेदना व दारिद्र्य विसरायला हवे ही सरकारी इच्छा आहे. मराठी भाषा दिवस उद्या साजरा होत आहे. मराठी भाषा चिरायू होवो, पण त्यासाठी मराठी शाळा टिकवायला हव्यात!