
ICC T20 World Cup 2026 आता अंतिम टप्यात आला असून सेमी फायनलचा थरार पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. हिंदुस्थान, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे चार बलाढ्य संघ अगदी थाटात सेमी फायनलमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे रोमांचक, थरारक आणि अटीतटीच्या लढती होतील, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. मात्र, पाऊस चाहत्यांच्या अपेक्षेवर कधीही पाणी फिरू शकते. जर सेमी फायनलच्या लढतींमध्ये पावसाने अनपेक्षित धप्पा दिला, तर ICC चा नियम काय सांगतो?
कोलकाताच्या एतिहासिक इडन गार्डन्सवर 4 मार्च रोजी पहिली सेमी फायनल दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये खेळली जाणार आहे. तर दुसरी सेमी फायनल 5 मार्च रोजी हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यामध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळली जाणार आहे. परंतू जर पावसामुळे सामना रद्द झाला तर, ICC च्या नियमांनुसर राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. सेमी फायनल आणि फायनल दोन्ही सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. म्हणजेत जर 5 मार्च रोजी हिंदुस्थानविरुद्ध इंग्लंड सामना पावसामुळे होऊ शकला नाही, तर हा सामना 6 मार्च रोजी खेळला जाईल.
राखीव दिवशी नियोजीत सामना पावसामुळे पुन्हा एकदा रद्द झाल्यास सुपर 8 मध्ये गुणतालिकेत अव्वल असणारा संघ थेट फायनलमध्ये एन्ट्री मारेल. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सुपर 8 मध्ये आपापल्या ग्रुप मध्ये अव्वल असणारे दोन संघ थेट फायनलमध्ये आपली जागा पक्की करतील. म्हणजेच जर पावसाने धुमशान घातलं, तर दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे दोन्ही संघ थेट फायनलमध्ये एकमेकांना भिडतील.
























































