
नावात किरकोळ चूक असल्याच्या कारणावरून रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या किंवा जखमी झालेल्या व्यक्तीला रेल्वे प्रशासन भरपाई नाकारू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. रेल्वेला संबंधित कुटुंबाला व्याजासह भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
एका जुन्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने हा निकाल दिला. रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांनी भरपाईसाठी अर्ज केला होता. मात्र, रेल्वेच्या कागदपत्रांमधील नाव, आधार कार्ड आणि इतर ओळखपत्रावरील नावामध्ये थोडा फरक असल्याने रेल्वेने ही भरपाई देण्यास नकार दिला होता. आरसीटीने देखील तांत्रिक कारणास्तव मयत व्यक्तीच्या वारसांचा हा अर्ज फेटाळला होता.
यावर सुनावणी करताना, रेल्वे कायदा हा कल्याणकारी कायदा आहे. तांत्रिक चुकांमुळे एखाद्या कुटुंबाचा हक्क हिरावून घेता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. जर इतर पुराव्यांवरून ही तीच व्यक्ती असल्याचे सिद्ध होत असेल, तर नावातील स्पेलिंग किंवा आडनावातील बदलाकडे दुर्लक्ष केले पाहिजे. केवळ नावात तफावत हे कारण पुढे करून विमा किंवा भरपाई नाकारणे हे अन्यायकारक असल्याचे सांगत न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला फटकारले आहे.



























































