
आसाममध्ये आता ‘भाजप’ अस्तित्वातच नाही, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे माजी काँग्रेस नेत्यांच्या गटाचे नेतृत्व करत आहेत, जे केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपात गेले आहे. त्यांनी फक्त निवडणुका लढवण्यासाठी पक्ष बदलला आहे, अशा शब्दांत आसाम प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गौरव गोगोई यांनी भाजपवर टीका केली आहे.
आसाममधील विधानसभा निवडणुका काही आठवड्यांवर आल्या असताना आणि काँग्रेसमधून अनेक बड्या नेत्यांचे पक्षांतर होत असताना, गोगोई यांनी हे विधान केले आहे. आसाम भाजप म्हणजे आता केवळ वेगळ्या नावाने वावरणारी काँग्रेसच आहे. त्यांनी फक्त लेबल बदलले आहे, असे गौरव गोगोई म्हणाले. आता आसामची जनताच हे ठरवेल की त्यांना हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस हवी आहे, की तरुण गोगोईंच्या आदर्शांवर आधारित काँग्रेस. याचा निकाल आता जनताच देणार आहे.
आपल्यासमोर सध्या जी स्थिती आहे, ती म्हणजे हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालीलच काँग्रेस आहे. तिच्यावर केवळ भाजपचा शिक्का (tag) लागलेला आहे. तरुण गोगोई यांच्या कार्यकाळात ज्या नेत्यांनी गैरकृत्ये केली होती, तेच नेते आता भाजपमध्ये सामील झाले आहेत. ही निवडणूक म्हणजे तरुण गोगोई यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आणि हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस यांच्यातीलच एक लढाई असेल, असे गोगोई यांनी माजुली येथे काँग्रेसचे उमेदवार डॉ. इंद्रनील पेगू यांच्यासाठी प्रचार करताना प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
आता आसाममध्ये भाजप अस्तित्वातच नाही. जे काही आहे, ते म्हणजे भाजपचे लेबल असलेला पक्ष आहे, पण प्रत्यक्षात हिमंता बिस्व सरमा यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, काँग्रेसचे काही माजी नेते ‘वाजपेयी भवन’मध्ये एकत्र जमले आहेत आणि केवळ स्वतःच्या व आपल्या कुटुंबाच्या हितासाठी निवडणुका लढवण्याचा निकराचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे, आम्ही अशा काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतो, जी तरुण गोगोई यांच्या आदर्शांनी प्रेरित आहे, असे ते म्हणाले.
या निवडणुकीच्या हंगामात काँग्रेसमधून काही अत्यंत महत्त्वाच्या नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. गेल्याच महिन्यात, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर, लोकसभा खासदार आणि राज्याचे माजी मंत्री प्रद्युत बोरदोलोई यांनीही भाजपची वाट धरली. आसामची जनताच आता हा निर्णय घेईल की त्यांना हिमंता बिस्व सरमा यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस हवी आहे, की तरुण गोगोई यांच्या आदर्शांवर आधारित काँग्रेस हवी आहे, असे ते म्हणाले.

























































