बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहोचवा! नवी मुंबईत जागर व्याख्यानमालेचे उ‌द्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 समानता ही आपोआप निर्माण होत नाही तर ती विचारांतून आणि कृतीतून रुजवावी लागते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घराघरात पोहोचले तरच खऱ्या अर्थाने लोकशाही समाजात रुजेल, असा ठाम विश्वास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अॅड. वर्षा देशपांडे यांनी व्यक्त केला. नवी मुंबई महापालिकेतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ऐरोली सेक्टर 15 येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात आयोजित करण्यात आलेल्या ‘जागर 2026’ व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

स्त्रीला देवी म्हणून पुजणे किंवा दासी म्हणून हिणवणे या दोन्ही टोकाच्या भूमिका चुकीच्या आहेत. स्त्रीला माणूस म्हणून स्वीकारणे हीच खरी समानतेची सुरुवात असणार आहे. समाजातील स्त्रीच्या योगदानाची केवळ जाणीव ठेवून उपयोग नाही तर ती प्रत्यक्ष व्यवहारात मान्य करून अंगीकारणे आवश्यक आहे. स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठीचा लढा, दारूबंदी चळवळ तसेच महिलांच्या मालमत्तेवरील हक्कासाठी केलेल्या आंदोलनांमुळे महिलांच्या नेतृत्वाची ताकद अधोरेखित केली असल्याचे वर्षा देशपांडे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

समानतेवर आधारित नाते हवे

संसार हा दोन चाकांचा रथ असला तरी निर्णयाचे नियंत्रण पुरुषांकडेच असल्याची वस्तुस्थिती बदलून समानतेवर आधारित नाते निर्माण होणे गरजेचे आहे, असेही देशपांडे यांनी यावेळी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला महापौर सुजाता पाटील, स्थायी समिती सभापती अशोक पाटील, नगरसेविका ऐश्वर्या सोनावणे, उपायुक्त संघरत्ना खिल्लारे, लेखक-उद्योजक प्रफुल्ल वानखेडे आदी उपस्थित होते.