
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा आमचा निर्णय झाला आहे. आमचा निर्णय आम्ही हायकमांडला कळवणार आहोत. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आम्ही निर्णय घेऊ, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.
बारामती पोटनिवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. सकाळीच रोहित पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली होती. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्विट करत काँग्रेसने माघार घेत निवडणूक बिनविरोध करावी अशी विनंती केली. याबाबत काँग्रेसमध्येही खलबते सुरू आहेत. या सर्व घडामोडींवर माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उमेदवार मागे घेण्याचा आमचा निर्णय झाल्याचे सांगितले.
सुनेत्रा पवार यांचा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा फोन झाला. एकूण परिस्थिती आणि सगळ्या लोकांशी भावना लक्षात घेता या निवडणुकीत पुढे जाऊ नये अशी भूमिका दिसली. त्यामुळे आमच्या सगळ्यांचे एकमत झाले आहे. याबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी कानावर ही गोष्ट टाकून आम्हाला अंतिम निर्णय घ्यावा लागेल, असे वडेट्टीवार म्हणाले.
“बारामतीतील अर्ज मागे घेण्याबाबत अंतिम निर्णय आम्ही पक्षातील वरिष्ठांशी चर्चा करूनच घेऊ. भाजप फोन करेल असं वाटतं नाही आणि तशी अपेक्षाही नाही. कोणालाही अडथळा आणण्यासाठी आम्ही मैदानात उतरत नाही, वैचारिक पातळीवर लढणं ही आमची भूमिका आहे.”
हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष



























































