भाजपच्या राज्यात सामाजिक सलोख्या प्रमाणे निसर्गही उद्ध्वस्त केला जात आहे, अरवली पर्वतरांगांवरून आदित्य ठाकरे यांची टीका

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे अरवली पर्वतरांगांबाबत केंद्र सरकारवर तीव्र टीका केली आहे. “केंद्र सरकारचे पर्यावरण मंत्री अरवली पर्वतरांग नष्ट करण्याच्या प्रस्तावाचं समर्थन करत आहेत, हे पाहणं अत्यंत लाजिरवाणं आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे म्हणाले की, “सगळ्यात आधी प्रश्न असा आहे की हे प्रकरण उघडकीस आल्यानंतरही खोटं का बोललं जातंय? आणि समजा अरवली पर्वतरांगांचा एखादा छोटासा भाग असला, तरी तो खाणकामासाठी खुला का केला जातोय?” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

“भाजप हिंदुस्थानच्या पर्यावरणाचा प्रत्येक भाग नष्ट करण्यासाठी इतकी आग्रही का आहे? ज्या पद्धतीने सामाजिक सलोखा उद्ध्वस्त केला जातोय, त्याच पद्धतीने निसर्गही उद्ध्वस्त केला जात आहे,” असे त्यांनी म्हटले.

“आज अरवली पर्वतरांग आहेत, उद्या पश्चिम घाट किंवा हिमालय खाणकामासाठी खुले केले जातील, अशी भीती वाटते,” असे ते म्हणाले.

राजस्थानमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून अरवली पर्वतरांगांच्या संरक्षणासाठी लढा देत आहेत, याचे कौतुक करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “संपूर्ण राजस्थान एकजुटीने अरवली पर्वतरांगांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरलेलं पाहून खरोखर प्रेरणा मिळते.”

“सरकारने आता नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षणासाठी दुप्पट प्रयत्न करायला हवेत. मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून तशी अपेक्षा ठेवणं कठीण आहे,” अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.