
धारावी पुनर्विकास प्रकल्प हा जगातील सर्वात मोठा जमीन घोटाळा आले. धारावीचा पुनर्विकास करताना पहिल्यांदा धारावीकरांचा विकास झाला पाहिजे. पण सरकार आणि अदानी तसे करत नाही. पुनर्विकासाच्या नावाखाली धारावीकरांची घरे रिकामी केली जाणार आहेत. पुनर्विकासात घरे दिली जातात. मात्र, धारावीकरांना घरे देण्याऐवजी अदानी धारावीकरांना देवनारच्या कचऱ्यात टाकतो आहे, असा संताप व्यक्त करत शिवसेना हे होऊ देणार नाही. शिवसेना धारावीकरांच्या खांद्याला खांदा लावून लढेल, असा निर्धार शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
अदानीच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पातून सुमारे 75 टक्के रहिवाशांना धारावीबाहेर फेकले जाणार आहेत, अशी भीती धारावी बचाव आंदोलन समिती आणि स्वयंसेवी संस्थांनी व्यक्त केली आहे. पहिल्या यादीत अदानीने गणेशनगरच्या मेघवाडीतील 75 टक्के रहिवाशांना अपात्र केले आहे. या धारावीतील रहिवाशांनी आज आदित्य ठाकरे यांची भेट घेत धारावीसाठी लढा उभारण्याची विनंती केली. यावेळी शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, विभागप्रमुख आमदार महेश सावंत, माजी आमदार बाबूराव माने यांच्यासह शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
देवनार डम्पिंगवर अदानी, श्रीनिवास यांनी दोन महिने राहून दाखवावे!
धारावीकरांना घराबाहेर काढून त्यांना देवनार डम्पिंग ग्राऊंडवर टाकले जाणार आहे. मात्र, त्या आधी गौतम अदानी आणि डीआरपीचे सीईओ श्रीनिवास यांनी देवनारमध्ये दोन बंगले बांधावेत. या बंगल्यात दोन महिने राहून दाखवावे आणि नंतरच धारावीकरांना देवनारमध्ये पाठवण्याची हिंमत करावी, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले.