कल्याणच्या बल्याणी येथील दुर्घटना, केबीके शाळेची भिंत चाळीवर कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील बल्याणी येथे एका खासगी शाळेची संरक्षक भिंत बाजूच्या चाळीवर कोसळून एका ११ वर्षांच्या विद्यार्थ्यांचा हकनाक बळी गेला. या दुर्घटनेत आणखी दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. अंशुकुमार सिंह असे मृत मुलाचे नाव असून अभिषेक साहानी (१०) आणि शोएब शेख (६) अशी जखमी मुलांची नावे आहेत. याप्रकरणी बेजबाबदार केबीके इंटरनॅशनल शाळा प्रशासनावर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त रहिवाशांनी केली आहे.

केडीएमसी हद्दीतील ‘अ’ प्रभाग क्षेत्रातील बल्याणी परिसरातील एसके नगरजवळ केबीके इंटरनॅशनल ही खासगी शाळा आहे. आज दुपारी चार वाजता शाळेची धोकादायक झालेली भिंत शेजारील श्री कृपा चाळीवर कोसळली. याठिकाणी लहान मुले खेळत होती. कोसळलेल्या भिंतीखाली अंशुकुमार सिंह, अभिषेक साहानी आणि शोएब शेख दबले गेले. स्थानिकांनी तातडीने भिंतीचे दगड, माती बाजूला करून मुलांना रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच अंशुकुमार सिंह याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दोन्ही जखमी मुलांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कुटुंबीयांचा हंबरडा काळीज पिळवटणारा

हसती, बागडती मुले एका क्षणात भिंतीखाली गाडली गेली. एकाचा मृत्यू तर दोघे जखमी झाले. मुलांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर कुटुंबीयांनी रुग्णालय आवारात एकच गर्दी केली होती. अंशुकुमारचा मृत्यू झाल्याचे कळताच त्याच्या कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा सर्वांचे काळीज पिळवटून टाकणारा होता.

भिंत धोकादायक तरीही शाळेचे दुर्लक्ष

केबीके शाळेची भिंत धोकादायक झाली होती. भिंतीला ठिकठिकाणी तडे गेले होते. चाळकऱ्यांनी यापूर्वीच शाळा व्यस्थापनाला धोकादायक भिंत दुरुस्त करावी अशी विनंती केली होती. मात्र शाळा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आजची दुर्घटना घडल्याचा संताप रहिवाशांनी केला.