
अहमदाबाद विमान दुर्घटनेत 279 प्रवाशांचा मृत्यू होऊनही एअर इंडियाच्या ड्रिमलायनरचा लोचा कायम असल्याचे सोमवारी उघड झाले. हॉंगकॉंग विमानतळावरून दिल्लीच्या दिशेने झेपावलेल्या ड्रिमलायनरमध्ये हवेत 22 हजार फूट उंचावर असताना तांत्रिक बिघाड लक्षात आला. वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत तातडीने एटीसीला संपर्क केला आणि विमान माघारी फिरवून हॉंगकॉंग विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिंग केले. त्यामुळे अनर्थ टळला. लॅंडिंग होईपर्यंत प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता.
एअर इंडियाच्या ड्रिमलायनर बोईंग 787-8 विमानाने हॉंगकॉंग विमानतळावरुन सोमवारी सकाळी 12.16 वाजण्याच्या सुमारास उड्डाण घेतले होते. मात्र काही वेळातच विमान 22 हजार फूट उंचीवर असताना त्यात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले. वैमानिक आणि क्रू मेंबर्सनी प्रवाशांना घाबरुन न जाण्याचे आवाहन करीत इमर्जन्सी लॅंडिंगसाठी प्रयत्न सुरु केले. अहमदाबादमध्येही ड्रिमलायनर विमानाला भीषण दुर्घटना झाली होती. त्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनर्थ घडण्याआधी वेळीच लॅंडिंग करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. अखेर हॉंगकॉंग विमानतळावर सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क करुन विमानाचे इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले आणि प्रवाशांना सुखरुप विमानतळावर उतरवण्यात आले. त्यानंतर विमानातील बिघाडाच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आणि प्रवाशांसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली.
उड्डाणापूर्वीही मनस्ताप
दिल्लीच्या दिशेने चाललेल्या विमान प्रवाशांना एअर इंडिया ड्रिमलायनरच्या उड्डाणापूर्वीही मनस्ताप सहन करावा लागला होता. हे विमान सकाळी 8 वाजून 50 मिनिटांनी टेक ऑफ घेणार होते. मात्र अज्ञात कारणासाठी विमान धावपट्टीवरच थांबवून ठेवले होते. नंतर जवळपास साडेतीन तासांनी विमानाने उड्डाण केले. परंतु, अवघ्या काही मिनिटांतच हवेत तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांची घाबरगुंडी उडाली. एअर इंडिया प्रशासन विमानाच्या उड्डाणापूर्वी काळजीपूर्वक तपासणी का करीत नाही? प्रवाशांच्या जिवाशी जाणूनबूजून खेळ चालवला जात आहे का? असे संतप्त सवाल विमान प्रवाशांकडून उपस्थित केले जात आहेत.