
अकोल्यामध्ये प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे तब्बल 29 कोटींचा दलित वस्तीचा विकासनिधी शासनाकडे परत गेल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याची गंभीर दखल घेत शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये प्रशासनाला धारेवर धरल्याने हंगामा झाला.
अकोल्यात नियोजन समितीची बैठक नियोजन भवन येथे आज आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री अॅड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षेखाली सुरू असलेल्या बैठकीत दलित वस्ती सुधार योजनेबाबत चर्चा सुरू होती. यावेळी शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी 29 कोटींचा विकास निधी परत गेल्याबद्दल प्रशासनाला धारेवर धरले. भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांना हा मुद्दा चांगलाच झोंबला. यामुळे दोन्ही आमदारांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. बैठकीमधील वाद कार्यालयाबाहेर आल्याने शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी हस्तक्षेप करीत वाद थांबवला.
पांढऱया कपडय़ाच्या आडून भ्रष्टाचार
निधीचा गैरवापर होत असल्यामुळे माझ्या अधिकारात मी सभेत प्रश्न उपस्थित केला, मात्र या प्रश्नाचे उत्तर कुणीही दिले नाही. आपला भ्रष्टाचार बाहेर येईल, या भीतीमुळेच विरोधक शांत बसल्याचा घणाघात आमदार नितीन देशमुख यांनी केला. पांढऱया कपडय़ाआडून भ्रष्टाचार सुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
29 कोटींचा दलित वस्तीचा विकास निधी परत पाठवल्याचा प्रकार इतिहासात पहिल्यांदाच घडला आहे. अशा प्रकारे निधी परत जाणारा अकोला हा पहिला जिल्हा आहे. जिल्हा परिषदेचा निधी महानगर पालिकेला कधीच हस्तांतरीत झालेला नाही. जिह्यात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे.
– नितीन देशमुख, आमदार, शिवसेना