बंगळुरुची विजयानवमी! चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या सर्व सामन्यांत बंगळुरूचे शतप्रतिशत यश

बंगळुरू संघासाठी चिन्नास्वामी स्टेडियम हे घर असलेले तर 18 वे आयपीएल त्यांनी घराबाहेर जिंकलेय. कुणाचा विश्वास बसणार नाही, पण चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेले सर्वच्या सर्व नऊ सामने जिंकून विजयानवमी साजरी केली. तो अशी कामगिरी करणारा पहिला आणि एकमेव संघ ठरला आहे.

यंदाचे आयपीएल बंगळुरू संघासाठी आगळेवेगळे ठरले. आयपीएलमध्ये बहुतांश संघ आपल्या घरच्या मैदानावर जिंकतात आणि बाहेर हरतात. मात्र यावेळी बंगळुरूला चिन्नास्वामी स्टेडिमयवर केवळ एकच विजय मिळवता आला. हैदराबादविरुद्धचा सामना पावसामुळे लखनौला स्थलांतरित करण्यात आला. हा सामना ते हरले. आयपीएलमध्ये सात सामने घरात आणि सात सामने बाहेर खेळले जातात. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार बंगळुरूबाहेर झालेल्या सातही सामन्यांत बंगळुरूने विजयाचा जल्लोष साजरा केला. तर बंगळुरूवर खेळल्या गेलेल्या सहापैकी तीन सामने हरले आणि दोन सामने जिंकले आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला. तसेच चिन्नास्वामीवर लखनौविरुद्धचा सामना पावसाच्या शक्यतेमुळे लखनौला खेळविण्यात आला जिथे बंगळुरूला हार सहन करावी लागली. हा सामना बंगळुरूचा घरच्या मैदानावरीलच सामना समजला जात असल्यामुळे हा पराभव घरातलाच मानला गेला. म्हणजेच साखळीतील सातही सामने बंगळुरू जिंकली.

बंगळुरूने आपली सलामीची लढत ईडनवर कोलकात्याविरुद्ध खेळली आणि या सामन्यात त्यांनी गतविजेत्या कोलकात्याला हरवण्याचा चमत्कार केला. कोलकात्याचे 175 धावांचे आव्हान बंगळुरूने सात विकेट राखून जिंकले. त्यानंतर त्यांच्या विजयाचा रथ शेवटपर्यंत थांबला नाही. ते एकीकडे बाहेर जिंकत होते तर त्यांना घरात पराभवाचे धक्के सहन करावे लागत होते. चिन्नास्वामीवर खेळले गेलेले पहिले तीन सामने ते चक्क हरले. त्यांनी बाहेरच्या मैदानांवर सलग पाच विजय नोंदवले, पण त्यांना घरच्या मैदानावर विजयाचे खातेही उघडता येत नव्हते. मग त्यांनी चिन्नास्वामीवर खेळल्या गेलेल्या आपल्या चौथ्या सामन्यात राजस्थानला हरवण्याचा खेळ केला. मग त्यांनी चेन्नईलाही हरवले. मग कोलकात्याविरुद्धचा सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला. तेव्हा पुढचा सामनाही पावसामुळे रद्द होण्याची भीती असल्यामुळे हैदराबादविरुद्धचा सामना लखनौला खेळविण्यात आला. मात्र या सामन्यात बंगळुरूला पराभवाचा धक्का बसला. मात्र पुन्हा लखनौत झालेल्या सामन्यात बंगळुरूने लखनौला धक्का दिला आणि बाहेरच्या सातही सामन्यांत विजयाची सत्ता ठोकली.

सलग सात सामन्यांनंतर क्वालिफायर वन आणि अंतिम सामना या दोन्ही लढती मुल्लानपूर आणि अहमदाबाद येथे झाल्या आणि बंगळुरूने आपल्या विजयी सातत्या कायम ठेवताना नॉनस्टॉप नऊ विजय नोंदवले. आयपीएलच्या 18 वर्षांच्या इतिहासात घराबाहेर अपराजित असलेला बंगळुरू हा पहिला संघ ठरला आहे. विशेष म्हणजे घराबाहेर झालेल्या नऊपैकी सात सामने त्यांनी पाठलाग करताना जिंकले तर दोन सामन्यांत त्यांनी प्रथम फलंदाजी करताना बाजी मारली. म्हणजेच पूर्ण स्पर्धेत ते 11 पैकी 8 सामने त्यांनी पाठलाग करत जिंकलेत.