
सिद्धांत कंपनीतील पाच पार्टनर कोण आहेत, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. शिरसाट यांना फायदा व्हावा म्हणून अधिकाऱ्यांनी वेदांत हॉटेल लिलावाचे टेंडर काढताना नियम डावलले. मागच्या काळात या टेंडरमध्ये 40 कोटींची सॉल्वन्सी होती. ती अधिकाऱ्यांनी काढून टाकली. कंपनीची उलाढाल 45 कोटींची असली पाहिजे, ती नोंदणीकृत असली पाहिजे हेसुद्धा पाहिले जाते. परंतु या प्रकरणात तसे झाले नाही. कारण शिरसाट यांनी हे हॉटेल आपल्यालाच मिळावे यासाठी मंत्रिपदाचा गैरवापर केला, असे दानवे म्हणाले.
काही गोष्टी वैयक्तिक आहेत, त्या बोललो तर भारी पडेल अशा शिरसाट यांच्या विधानाचा समाचार घेताना, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये. शिरसाट यांनी त्यांच्या मुलाचे प्रकरण कसे मिटवले मला माहीत आहे. त्या प्रकरणात एका मुलीचा समावेश असल्याने मी काही बोलत नाही, असे दानवे म्हणाले.
छत्रपती संभाजीनगरात आमचे 22 हजार चौरस फूट घर नाही, मुंबईत 22व्या मजल्यावर घर नाही. अत्याधुनिक शेती नाही. आम्ही सामान्य शिवसैनिक आहोत. त्यामुळे शिरसाट यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. शिरसाटांना 65 कोटींचे कर्ज देणारी बँक शेतकऱ्याला एक लाखाचे कर्ज का देत नाही, असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला.