लेख – कल्पनाशक्ती आणि प्रेरणेचा स्रोत : वाचन

>> दिलीप देशपांडे n dilipdeshpande24@gmail. com

वाचनाद्वारे आपण ज्ञानाच्या वेगवेगळ्या स्रोतांशी जोडले जातो. वाचनामध्ये अनेक गुण आहेत. ते आम्हाला बाह्य जगाशी जोडलेले ठेवते. आमचा शब्दसंग्रह समृद्ध होतो. वाचनातून आपल्याला शुद्ध आनंद मिळतो. कादंबरी, कथा, विविध विषयांवरील लेखसंग्रह, कविता, प्रवासवर्णन,चरित्र, आत्मचरित्र, लेख आपल्या मनाचे मनोरंजन करतात. मनोरंजनाबरोबरच ज्ञान मिळते हे महत्त्वाचे आहे. वाचनाने आपली कल्पनाशक्ती जागृत होते. नवनवीन प्रेरणा मिळतात आणि म्हणूनच तो प्रेरणा दिवस आहे. म्हणून आपल्यातली वाचनाची आवड वृद्धिंगत करावी. आपल्या सगळ्यांनाच आजच्या वाचन प्रेरणा दिवसातून वाचनाची प्रेरणा मिळावी ही अपेक्षा.

माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना आदरांजली म्हणून 15 ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. मुलांना वाचनामध्ये गोडी निर्माण व्हावी, वाचनाचे महत्त्व समजावे, शाळा-महाविद्यालयात विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी, ती निर्माण व्हावी हाच वाचक प्रेरणा दिनाचा उद्देश आहे. अभ्यास एक अभ्यास न राहता अवांतर वाचनही आवश्यक आहे. त्याचे अनेक फायदेही आहेत. अवांतर वाचनाने अनेक संदर्भ मिळतात. आकलनशक्ती वाढते. व्यक्तिगत विकास तर होतोच.

राज्यातील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालये यातून हा मुख्यत्वे साजरा व्हावा या उद्देशाने सरकारी पातळीवरूनही निर्देश दिले जातात. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने शाळा, महाविद्यालयात डॉ. कलाम यांच्या पुस्तकांचे वाचन व्हावे, एक वाचन कट्टा त्यासाठी निर्माण व्हावा, त्यात सगळ्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा सहभाग असावा. सामाजिक स्तरावरही याचा प्रसार करून या वाचन कट्टय़ासाठी पुस्तके गोळा करावीत आणि शाळेशाळेमध्ये पुस्तक पेढी तयार करावी. डॉ. कलाम यांना आदरांजली म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा. शिक्षकांनीही कलाम यांच्या पुस्तकांचे वाचन करावे. डॉ. कलाम यांचे लेखन विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचारदृष्टी, प्रेरणा देण्याचे कार्य करतील हा विचार यामागे आहे. स्वयंसेवी संस्था, शिक्षकांनी, माजी विद्यार्थ्यांनी, पालकांनी शाळेतील या वाचन कट्टय़ाला एक पुस्तक किंवा शक्य तेवढी पुस्तके भेट द्यावीत.

शाळांमधून विद्यार्थ्यांना एक तास मुक्तपणे वाचन करण्याचा आनंद मिळावा म्हणून ठेवावा. त्यांना त्या तासाला पुस्तके उपलब्ध करून द्यावीत. पुस्तके प्रेरणा तर देतातच, पण महत्त्वाचे म्हणजे ते ज्ञानाचे स्रोत आहेत. वाचनात अनेकविध गुण आहेत. शब्दसंग्रह समृद्ध तर होतोच, पण ज्ञानाची कक्षाही रुंदावते. मनोरंजन हा भाग तर आहेच. शाळाशाळांतून चांगल्या पुस्तकांवर चर्चासत्रांचे आयोजन करणे, एखाद्या पुस्तकावर व्याख्यान, लेखक, कवींना आमंत्रित करून त्यांच्याशी विद्यार्थ्यांचा संवाद घडवून आणणे, मुलांना बोलत करणे. पुस्तकांचे प्रदर्शन अशा प्रकारांनी कार्यक्रम केले जावेत. महान व्यक्तींच्या जीवनात वाचनाचा पडलेला प्रभाव या विषयावरचे व्याखानही आयोजित केले जाऊ शकते. एखाद्या पुस्तकावर विद्यार्थ्यांमध्येही चर्चा घडवून आणली जाऊ शकते.

इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे, इंटरनेटच्या मोहजालामुळे वाचन कमी होतय का? फेसबुक व्हॉट्सअप इन्स्टाग्राम यामुळे वाचन संस्कृती हरवत चालली आहे का? हा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो. त्याचे उत्तर काही अंशी ‘होय’ असे आहे. काही दिवसांपूर्वी फेसबुक, व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम बंद पडल्यामुळे काय परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्या काळात किती अस्वस्थता आली होते, हे आपण बघितले आहे, अनुभवले आहे. आज ई-बुकचे वाचन मुले करतात असा दावा केला जातो, पण तो काही खरा नाही. एक पाचदहा टक्के मुलेही ते वाचत नसावीत. हातात पुस्तक घेऊन वाचण्याचा आनंद निराळाच असतो.

हा एक दिवस साजरा करून वर्षभर स्वस्थ बसणे आणि पुढच्याच वर्षी परत एक दिवसाचा वाचन प्रेरणा दिन साजरा करणे हा उद्दिष्टे असू नयेत. केवळ शिक्षण विभागाचा फतवा येतो म्हणूनचा उपचार नसावा. दरवर्षी कार्यक्रमाच्या बातम्या तर खूप वाचतो.

शालेय मुलांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून सातत्याने प्रयोग आणि प्रयत्नांची गरज आहे. डॉ. कलाम म्हणतात, विद्यार्थ्यांना घडवणाऱया शिक्षकामध्ये ही उच्च गुणांची गरज आहे. तो ज्ञानाने संपन्न असावा. विद्यार्थ्यांशी आपुलकी असावी. जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन असावा. केवळ पुस्तकी ज्ञान, शिक्षण देणे, एवढेच न करता मुलांची मने उच्च ध्येयाने प्रज्वलित केली पाहिजे.

विद्यार्थ्यांना टी. व्ही. , स्मार्टफोन, कॉम्पुटर यापासून काही काळ दूर करून त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करणे हाच हा दिवस साजरा करण्यामागचा प्रमुख उद्देश आहे.

अनेक शाळांमधून हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. नाही असे नाही, पण – हा दिवस फक्त तेवढय़ाच दिवसापुरता मर्यादित राहायला नको याचाही विचार व्हायला हवा.

डॉ.एपीजे अब्दुल कलाम नेहमीच म्हणत पुस्तकाच्या सहवासात ज्ञानाबरोबर नेहमीच मला आनंदही मिळाला आहे. ग्रंथ ही माझी सर्वात मौल्यवान अशी ठेव आहे. युवक वाचतील तर देश वाचेल अशी त्यांची खात्री होती. ‘वाचाल तर वाचाल’ असं आपण नेहमीच म्हणतो, पण त्या बोलण्याला खऱया अर्थाने अर्थ प्राप्त व्हायला हवा.

वाचन महत्त्वाचे का आहे? हा विचार करायला हवा. वाचनाची सवय आपल्याला एक चांगली व्यक्ती बनवू शकते. महान पुरुष आणि स्त्र्ायांच्या जीवनातून आपल्याला हे शिकायला मिळते की, त्यांच्यापैकी बहुतेक जणांना पुस्तके वाचण्यापासून प्रेरणा मिळाली आहे. दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी वाचन फक्त ॊएक छंद न करता गरज म्हणून अधिक वाचन केले. पुस्तके आम्हाला प्रेरित करून ज्ञान देतात. वाचनाद्वारे आपण ज्ञानाच्या वेगवेगळ्या स्रोतांशी जोडले जातो. वाचनामध्ये अनेक गुण आहेत. ते आम्हाला बाह्य जगाशी जोडलेले ठेवते. आमचा शब्दसंग्रह समृद्ध होतो. वाचनातून आपल्याला शुद्ध आनंद मिळतो. कादंबरी, कथा, विविध विषयांवरील लेखसंग्रह, कविता, प्रवासवर्णन,चरित्र, आत्मचरित्र, लेख आपल्या मनाचे मनोरंजन करतात. मनोरंजनाबरोबरच ज्ञान मिळते हे महत्त्वाचे आहे. आपले मन भरकटू देत नाही. वाचनाने आपली कल्पनाशक्ती जागृत होते. नवनवीन प्रेरणा मिळतात आणि म्हणूनच तो प्रेरणा दिवस आहे. म्हणून आपल्यातली वाचनाची आवड वृद्धिंगत करावी. आपल्या सगळ्यांनाच आजच्या वाचन प्रेरणा दिवसातून वाचनाची प्रेरणा मिळावी ही अपेक्षा.