लेख – कोरोना लसींचा प्रभाव आणि तिसरा डोस

>> प्रा. डॉ. गजानन रमाकांत एकबोटे

लसीचे दोन डोस घेणे हे रुग्णालयात दाखल होण्यापासून अत्यंत संरक्षणात्मक आहे हे सिद्ध झाले आहे. तिसऱ्या डोसचा मुख्य फायदा संसर्गाविरुद्ध प्रभावीपणा सुधारण्यात असेल. सध्याच्या उपलब्ध माहितीनुसार तिसरा डोस प्रतिपिंडांच्या पातळीत सुधारणा करतो आणि तिसऱ्या डोसनंतर रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. त्यामुळे काही देशांमध्येहाय रिस्करुग्णांना तिसरा डोस देण्यात येण्याची योजना आखली जात आहे. असे असले तरी, विचार करण्यासाठी इतर प्रश्न आहेत. सध्याची लस अद्याप मूळवुहान स्ट्रेनवर आधारित असल्याने दीर्घकालीन प्रभाविता ही एक चिंता आहे. जर दोन डोसनंतर प्रतिकारशक्ती कमी झाली तर तिसरा डोस किती काळ प्रभावी राहील? तिसरा डोस संभाव्य नवीन रूपांपासून (variants) संरक्षण करेल का, असे प्रश्न उरतातच.

हिंदुस्थानात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर आता कमी झाला आहे. लसीकरणातही 100 कोटींचा टप्पा गाठल्याचे सरकारने जाहीर केले आहे. तरीही चीनसह काही देशांमध्ये कोरोनाच्या साथीने पुन्हा उचल खाल्ली आहे. ही नक्कीच गंभीरपणे विचार करण्यासारखी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना लसीचा प्रभाव (इफेक्टिव्हनेस) आणि या लसींच्या तिसऱ्या डोसची गरज व परिणाम याचा विचार करणे अपरिहार्य ठरते.

कोविड संसर्गावर लसीचा प्रभाव समजण्यासाठी (Vaccine Effectiveness) इस्रायल, इंग्लंड आणि अमेरिका या देशांकडून काढलेल्या निष्कर्षांनुसार खालीलप्रमाणे माहिती मिळाली आहे.

लसीच्या प्रभावितेवर टक्केवारी माहितीः

table

वरील आकडेवारी दर्शवते की, संक्रमणापासून संरक्षण (लक्षणात्मक कोविडविरुद्ध प्रभावितेने दाखवल्याप्रमाणे) कमी झाले आहे, पण रुग्णालयात दाखल न होण्याचे प्रमाण वाढले आहे. इस्रायलच्या अभ्यासानुसार असेही दिसून आले आहे की, 2021 च्या सुरुवातीला लसीकरण केलेल्या व्यक्तींना त्यानंतर लसीकरण केलेल्या लोकांच्या तुलनेत संसर्ग होण्याची कमी शक्यता दिसत होती.

ही धोक्याची घंटा आहे का?

नाही. कारण कोविड रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यामुळे बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. तद्वतच, सार्वजनिक लसीकरण कार्यक्रमाने लोकसंख्येला संसर्ग, प्रसारण आणि हॉस्पिटलायझेशन (आणि त्यानंतरच्या मृत्यू) पासून संरक्षित केले आहे. आरंभीच्या लसीच्या कार्यक्षमतेच्या आकडेवारीमध्ये संसर्ग आणि हॉस्पिटलायझेशनविरुद्ध उच्च कार्यक्षमता दिसून आली. संक्रमणापासून संरक्षण कमी झाले असले तरीही, हॉस्पिटलायझेशनच्या विरुद्ध लस अजूनही फायदेशीर आणि संरक्षणात्मक आहे. उपलब्ध माहिती असे दर्शविते की, लसीकरणामुळे रुग्णालयात दाखल होण्यापासून संरक्षण मिळते. इंग्लंडमधील रोगांचा अलीकडील अभ्यास याला दुजोरा देतो.

मानवी रोगप्रतिकारक प्रणाली अतिशय गुंतागुंतीची आहे. रोगप्रतिकारक प्रणाली रोग निर्माण करणाऱ्या घटकांपासून संरक्षण करते. खाली दिलेले स्पष्टीकरण ही एक मूलभूत रूपरेषा आहे. यामधील सगळ्याच गोष्टी शरीरात तंतोतंत घडत नाहीत.

जेव्हा विषाणू शरीराला ‘संक्रमित’ करतो, तो प्रामुख्याने दोन ठिकाणी आढळतो. एक म्हणजे रक्ताभिसरण प्रणाली, जी हा विषाणू शरीरामध्ये फिरण्यासाठी वापरतो. दुसरे म्हणजे विविध पेशी ज्यामध्ये विषाणू प्रवेश (invasion of tissues)  करतो आणि या पेशींना गुणाकार (multiplication) करण्यासाठी वापरतो. या दोन ठिकाणी विषाणूचा सामना करण्यासाठी दोन मुख्य रोगप्रतिकारक यंत्रणा आहेत. एक म्हणजे प्रतिपिंडे आहे. प्रतिपिंडे विषाणूच्या प्रथिनांच्या पृष्ठभागावर अडकतात, ज्यामुळे ते आपल्या पेशींवर आक्रमण करण्यास प्रतिबंध करते. पुढे, ते विषाणूला नष्ट करतात. अशा प्रकारे, प्रतिपिंडे संरक्षणाची पहिली पायरी मानली जाऊ शकतात, परंतु विषाणूंनी पेशींमध्ये प्रवेश केल्यावर प्रतिपिंडे प्रभावहीन बनतात. या टप्प्यावर, रोगप्रतिकारक शक्ती ही योग्य ठरते.

रोगप्रतिकारक शक्तीचे Killer T Cell असे योग्य नामकरण झालेले आहे. या पेशी आपल्या शरीरातील स्वतःच्या पेशींना लक्ष्य करतात. ज्या या विषाणूंना आश्रय देतात आणि ज्यामध्ये विषाणूची प्रतिकृती निर्माण होते. T Cell अशा नष्ट करतात, त्यामुळे त्यांच्यातील विषाणू नष्ट होतो. आपल्या शरीराच्या पेशींमध्ये एकदा का विषाणूने प्रवेश केला की रोग होतो. जरी प्रतिपिंडांचा प्रतिसाद कमकुवत असेल तरी एक T Cell गंभीर रोगापासून संरक्षण करू शकते.

`T’ पेशी विषाणू असलेल्या पेशींवर हल्ला करून त्यांना नष्ट करतात. लसीकरणामुळे निर्माण झालेली रोगप्रतिकारक शक्ती काळानुसार आणि विषाणूच्या बदलत्या प्रकारानुसार प्रतिसाद देते. प्रतिपिंडांचा प्रभाव कालांतराने कमी होतो. गरजेनुसार प्रतिपिंडे तयार करण्यासाठी शरीरामध्ये ‘स्मरणशक्ती’ असली तरी या प्रक्रियेला वेळ लागू शकतो. प्रतिपिंडांच्या कमकुवत आणि उशिरा प्रतिसादामुळे संसर्ग होऊ शकतो (लक्षणात्मक कोविड), परंतु जर T Cell प्रतिसाद योग्य असेल तर व्यक्ती गंभीर रोगापासून संरक्षित राहते.

याव्यतिरिक्त रोगाच्या एका प्रकारासाठी तयार झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीला नवीन प्रकाराचा सामना करावा लागल्यास लसीची प्रभावीता कमी होऊ शकते. येथेही दोन उपचार पद्धतींच्या प्रतिसादातील फरक महत्त्वपूर्ण आहेत. प्रतिपिंडे प्रामुख्याने विषाणूंच्या पृष्ठभागावरील प्रथिनांवर (प्रामुख्याने आकार किंवा थ्री डी कॉन्फिगरेशन) वर प्रतिक्रिया देतात. त्यामुळे या पृष्ठभागाच्या प्रथिनांमधील बदल प्रतिपिंड प्रतिसादाची प्रभावीता कमी करतात.

T Cell विषाणूंच्या पृष्ठभागावरील अनेक प्रथिनांना प्रतिसाद देतात. त्याचप्रमाणे विषाणूंच्या पृष्ठभागांवरील अनेक भागांवर हल्ला करतात. T Cell विस्तृत समूहाला प्रतिसाद देत असल्याने पृष्ठभागावरील प्रथिने नियंत्रित असलेल्या विशिष्ट भागावर प्रतिसाद देणाऱ्या प्रतिपिंडांच्या तुलनेत T Cell अधिक प्रतिरोधक असू शकतात.

T Cell प्रतिसादाची प्रभाविता हॉस्पिटलायझेशन विरुद्ध संरक्षण स्पष्ट करते. सध्या हे स्पष्टीकरण रोगप्रतिकारक प्रणालीच्या कार्याच्या सामान्य तत्त्वांवर आधारित निष्कर्ष आहे. काही व्यक्तींच्या केलेल्या अभ्यासावरून असे दिसून आले की, विषाणूंच्या बदलत्या स्वरूपासाठी T Cell प्रतिसाद प्रभावी आहे. वरील निष्कर्षांची पुष्टी करण्यासाठी अधिक संशोधन आवश्यक आहे.

यावरून असे लक्षात येते की, प्रतिपिंडे म्हणजे उपलब्ध संरक्षणात्मक संसाधनांची पूर्णता नाही. T Cell मोजमापांच्या तुलनेत प्रतिपिंडे चाचण्या करणे, मोठय़ा प्रमाणावर मोजणे सोपे आहे. व्यक्तींनी मात्र अशा चाचण्यांवर अवलंबून राहू नये. लसीकरण करणे आणि कोविडसंदर्भात सर्व नियम पाळून तसे वर्तन करणे हे सर्वोत्तम आहे.

तिसरा डोस मदत करेल का?

लसीकरणाचे दोन्ही डोस घेतल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात दाखल होण्यापासून वाचवते. साधन मर्यादित परिस्थितीत, पहिल्या व दुसरा डोस दिल्यानंतर तिसरा डोस देणे म्हणजे आधीच जीवन रक्षक कवच घातलेल्या व्यक्तींना अजून एक जीवनावश्यक कवच (लाईफ जॅकेट) देण्यासारखे आहे. ज्यांना जीवनरक्षक कवच मिळालेच नाही, अशा व्यक्तींना जीवनरक्षक कवच देणे आवश्यक आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी स्पष्ट करता येईल. याशिवाय असे म्हणता येईल की, लसीचा प्रभाव कोरोना संक्रमणाबाबतीत कमी होत आहे, परंतु लस घेतल्याने रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी होत आहे, असे संशोधनाअंती दिसून येत आहे. त्यामुळे आपल्या देशात प्रत्येक व्यक्तींचे पूर्ण लसीकरण होणे आवश्यक आहे. तिसरी मात्रा  ‘हाय रिस्क’ रुग्णांनी घ्यावी, याबद्दल सर्व शास्त्र्ाज्ञांचे एक मत आहे.

हिंदुस्थानात बहुसंख्य लोकसंख्येला पूर्णपणे लसीकरण केले गेले नाही आणि म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागते. शिवाय हिंदुस्थानी लोकसंख्येमध्ये दोन-डोसच्या प्रभावितेमध्ये संभाव्य घट आणि तिसऱ्या डोसच्या फायद्यांचा अभ्यास करणारी कोणतीही माहिती/संशोधन उपलब्ध नाही. या प्रश्नांमुळे आणि लसीच्या पुरवठय़ातील सतत येणाऱ्या अडचणींमुळे, रुग्णालयात दाखल होण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पात्र लोकसंख्येचे (मुलांसाठी लसीकरणाच्या मंजुरीसह) पूर्ण लसीकरण झाले पाहिजे. मास्क वापरणे, वैयक्तिक स्वच्छता ठेवणे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, बंद जागेमध्ये योग्य वायुविजन असणे यासारख्या गोष्टी अमलात आणाव्या लागतील. प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी मूलभूत खबरदारी चालू ठेवली पाहिजे.

(लेखक बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे शल्यचिकित्साशास्त्र (Surgery)चे प्राध्यापक आहेत.)