मनतरंग – ‘नाही’ म्हणायचं की नाही?

>> दिव्या नेरुरकरसौदागर

हल्लीच्या तरुणांना काही बाबतीत नाहीम्हणणं जमत नाहीये. ‘सब चलता है!’ हा दृष्टिकोन नात्यांमध्येही आणला तर तो कधी स्वतच्या आत्मविश्वासावर गदा आणू शकतो हे त्यांना कळत नाही. ज्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर होऊ शकतो आणि अनेकांच्या झालेलाही आहे. नकार देण्यासाठी जास्त हिंमत लागत नाही तर लागतो स्वतवरचा ठाम विश्वास. हा विश्वासच आपल्याला सगळ्यात बेस्ट देऊ शकतो.

दिनेशचं शिखाशी (दोघांची नावे बदलली आहेत) लग्न जसं पक्कं झालं तसं त्याला अस्मान ठेंगणं झालं. त्याच दिवशी तो शिखाला घेऊन देवळात गेला आणि देवाच्या पाया पडून आला. आपल्या हक्काच्या होणाऱया बायकोला कुठे ठेवू आणि कुठे नको असं त्याला झालेलं. त्याच वेळी त्याने त्याचा मित्र शुभमलाही,  (नाव बदलले आहे) देवळात बोलावलं होतं. शिखा मात्र शुभमला न भेटताच ‘काम आहे’ असं म्हणून निघून गेली. थोडा खट्टू झालेला दिनेश शुभमला येताना पाहून खुश झाला. थोडय़ाच दिवसांवर लग्न आलंय म्हणून दिनेशने शुभमकडून लागेल ती मदत करण्याचं कबूल करून घेतलं. ‘चला! म्हणजे तुमचं घोडं एकदाचं मार्गाला लागलं म्हणायचं,’ शुभम हसतहसत त्याला म्हणाला. ‘हो रे! मीही थोडा टेन्शनमध्येच होतो. शिखाचा काही नेम नव्हता. पण तिनेच लग्नाला आपणहून होकार दिला.’ दिनेश कसनुसा हसत म्हणाला खरा, पण शुभमच्या चेहऱयाच्या बदललेल्या छटा बघूनच त्याला अजून टेन्शन आलं आणि ते खरंच होतं. शुभम त्या दोघांनाही चांगला ओळखत होता आणि त्याला शिखाच्या अहंकारी स्वभावाची चांगलीच कल्पना होती. त्याला मित्राची काळजी वाटायला लागली.

‘बघ दिनेश, तुला खरंच तिच्याशी लग्न करायचं आहे ना? तिने तुला भरपूर कंडिशन्स घातल्यात. हल्ली त्याचं तू टेन्शन घेतो आहेस. म्हणून तुला पुन्हा एकदा वॉर्न करतोय तुझा मित्र म्हणून.’ शुभमने त्याला पुन्हा समजावून पाहिलं. दिनेशने शिखाबरोबर  त्याचं असलेल्या नात्याचं खरोखरच दडपण घेतलं होतं. पण त्याला ते नातं तोडायचंही नव्हतं. याआधी चार वेळा शिखाकडून ते तोडलं गेलं होतं तरीही.

दिनेश आणि शिखा हे एका ऑफिसमध्ये नोकरी करत होते. काम करता करता त्या दोघांचे सूर जुळले आणि त्यांची प्रेमकहाणी एका सिनेमाप्रमाणेच सुरू झाली होती. शिखा ही महत्त्वाकांक्षी आणि स्वभावाने अतिशय व्यावहारिक मुलगी होती. या उलट दिनेश हा प्रगती करणारा मुलगा असला तरी स्वभावाने अतिशय संवेदनशील होता आणि महत्त्वाचं म्हणजे नात्यांना महत्त्व देणारा होता. त्याच्या या स्वभावामुळे त्याला मित्रपरिवार लाभलेला होताच, शिवाय नातेवाईकांमध्येही तो प्रचंड प्रिय होता. दोनेक वर्षांनंतर दिनेशनेच शिखाजवळ लग्न करून ‘सेटल’ होण्याबद्दल विषय काढला तेव्हा ती  त्याच्यावर वैतागलीच होती.

‘मला माहीत नाही, पण त्या दिवशी ती डिस्टर्ब होती की काय? तिने मला लगेचंच जज केलं.’  समुपदेशनाला आलेला दिनेश त्याची समस्या सांगत होता. ‘मला त्या दिवशी खूप लो वाटत होतं म्हणून मी तिला फोन केला. तर ती माझ्यावरच उखडली. ‘तुला नाही तरी रडण्याशिवाय काय जमलंय आयुष्यात? लग्नानंतरही तू मुळूमुळू रडत राहणार आहेस का? माझी शिखा असं काही बोलू शकेल असं वाटलंच नव्हतं मला.’ दिनेश भरपूर दुखावला गेला होता हे त्याच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत होतं. शेवटी शुभमच्या सल्ल्यानुसार तो समुपदेशनाला आला होता. कारण दिवसेंदिवस दिनेश आणि शिखाचं नातं विषारी होत चाललं होतं. त्या ताणामुळे त्याच्या स्वभावातला बदल त्याला ओळखणारे सांगू शकत होते.

त्याने मित्रमैत्रिणींशी बोलणं बंद केलं होतं. नोकरीवरही तो जात नव्हता. त्याची झोप उडाली होती. कारण रोज रात्री शिखाशी बोलताना त्याचं पर्यवसन भांडणात व्हायचं. तिचा तोंडावरील ताबा सुटत चालला होता. त्यामुळे दिनेश दुखावत होता. त्याने त्यातही समजूतदारपणा दाखवून  तिला लग्नासाठी तयार केलं. शिखाने होकार देताना अटी घातल्या. त्याने त्या मान्यही केल्या. पण दुर्दैवाने त्यानंतर दोघांची भांडणं वाढली.

‘भांडणाचं कारण काय होतं तुमच्या? एवढी भांडणं होत होती तर लग्नाचा प्रस्ताव का ठेवला?’ असा त्याला प्रश्न करताच दिनेश भांबावला. ‘मॅम, तिच्या अपेक्षा वाढतच होत्या. तिने मला लिस्ट पाठवली ज्यात तिने हनिमूनसाठी फक्त फॉरेन टूर, नोकरीमध्ये
सॅलरी वाढ ज्यात तिने असंही मेन्शन केलेलं की लग्नाआधी नवा जॉब हवा, लग्नानंतर सेपरेट घर, जे तिला थ्री-बीएचके हवं होतं. मी मान्य केलं. कारण मला तिच्यासारख्या बेस्ट मुलीला गमावायचं नव्हतं.’

‘मग मी घर बघायला सुरुवात केली. नवीन नोकरीच्या शोधातही होतो. पण  माझा सगळ्यातला इंटरेस्ट गेला आणि सगळं निगेटिव्ह वाटायला लागलं. आता अशी सिच्युएशन आहे की मला ना जॉब करावासा वाटतो ना काही करावंसं वाटत.’ बोलता बोलता त्याच्या नकळत त्याच्या डोळ्यांत पाणी आलं. तो तसंच पुढे म्हणाला, ‘मला आता तिच्याशी लग्नही नाही करायचंय. कुठेतरी काहीतरी चुकतंय, पण कळत नाही काय चुकतंय ते.’  ‘तुला नकार द्यायला जमत नाहीये ना?’  त्याने होकार्थी मान डोलावली. दिनेशशी त्याच्या समस्येवर अधिक बोलताना लक्षात आलं की, त्याच्यावर शिखाकडून ‘दबाव’ टाकला जात होता आणि ती त्याला तिच्यासारखं व्यावहारिक बनवायला बघत होती. जेव्हा त्याला हे जमत नव्हतं तेव्हा ती त्याचा वाटेल तसा अपमान करत होती जे ‘शाब्दिक शोषण किंवा छळ’ या मानसिक छळाचा एक भाग होता.

दिनेश हा काही एकच तरुण नाही जो शाब्दिक शोषणाचा सामना करत होता. माझ्याकडे दिनेशसारख्या 7-8 केसेस येऊन गेल्या आहेत. ज्यात मुलगे अशा कारणांमुळे नैराश्याचा सामना करत होते. या सर्वांशी बोलताना काही गोष्टी ठळकपणे जाणवल्या की… ही सगळी मुलं सर्वसामान्य घरांतून आलेली होती. स्वकष्टावर ते उभे राहिले होते. जेव्हा त्यांना पुढची दालनं मिळाली तेव्हा त्यात भरपूर आमिषंही होती. त्यांच्या आजूबाजूला भरपूर स्पर्धा/रस्सीखेच होती. त्यांची स्वप्नं मोठी होती आणि स्वतला सिद्ध करण्याच्या नादात या  मुलांनी सद्सदविवेक बुद्धी गहाण टाकली होती.

हल्लीच्या तरुणांना काही बाबतीत ‘नाही’ म्हणणं जमत नाहीये. ‘सब चलता है!’ हा दृष्टिकोन नात्यांमध्येही आणला तर तो कधी स्वतच्या आत्मविश्वासावर गदा आणू शकतो हे त्यांना कळत नाही. ज्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर होऊ शकतो आणि झालेला आहे. दिनेश अजूनही त्याच्या मानसिक अस्वास्थ्याचा सामना करतोय. कारण, त्याला शिखाला गमवायचं नव्हतं. त्याच्या मते तिला गमावणं म्हणजे ‘त्याच्यात हिंमत नसणं’ असा काहीसा अतार्किक विचार त्याने केला होता. त्यामुळे तो ती जे म्हणेल त्याला होकार देत सुटला. पण त्याचा ‘आतला आवाज’ त्याच्याशी झगडत राहिला आणि त्याचा त्याला मानसिक शीण आला.

दिनेशवर काम करताना सर्वप्रथम त्याला आलेली भीती आणि दडपण घालवण्याचा प्रयत्न केला गेला. ‘शिखा गेली तर मला पुन्हा चांगली मुलगी मिळेल का?’ ही भीतीच त्याला कणखर बनवत नव्हती. तिच्याशी लग्न झाल्यावर त्याला शांतता मिळणार नव्हती.  पण तरीही त्याला नकार देणं जमत नव्हतं. शेवटी त्याला होकाराचे तोटे आणि नकाराचे फायदे समजावून देण्यात आले. नकार दिला तर काही दिवस दुःख होईल, पण नंतर मानसिक शांतता मिळेल हे त्याला हळूहळू समजलं. कारण त्याच्या नात्यात फक्त व्यवहार दिसत होता आणि व्यक्तीबद्दल आदर दिसत नव्हता.

दिनेशने सत्राला आल्यानंतर शांतपणे शिखाला नकार दिला आणि तिला कायमचं ब्लॉक केलं. त्याच्या चेहऱयावरचे शांत भाव बघून मनाला खरंच समाधान वाटलं.

 [email protected]

(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)